
भाजपा व त्यांची मातृसंस्था राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला पहिल्यापासूनच संविधान मान्य नाही. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला दिलेले संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा त्यांचा अजेंडा लपून राहिलेला नाही. संविधानाच्या उद्देशिकेतून सेक्युलर आणि सोशालिस्ट हे शब्द काढण्याच्या रा. स्व. संघाचे सरचिटणीस दत्तात्रय होसबळे यांच्या मागणीतून आज ते पुन्हा एकदा स्पष्ट होत आहे, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटले आहे.
यासंदर्भात प्रतिक्रीया देताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला हिंदू राष्ट्र स्थापन करायचे आहे हे सातत्याने त्यांच्या व भाजपा नेत्यांच्या विधानातून उघड होत आहे. 2024 च्या लोकसभा निवडणुकीत तर भाजपा नेते 400 जागांवर विजय मिळाला तर संविधान बदलणार हे जाहीरपणे सांगत होते. सरसंघचालक मोहन भागवत यांनीही संविधानाची समिक्षा केली पाहिजे असे वक्तव्य केले होते. तर पंतप्रधान मोदी यांचे आर्थिक सल्लागार म्हणून काम पाहताना विवेक देबरॉय यांनीही संविधान बदलण्याची गरज आहे असे उघडपणे म्हटले होते. भाजपा व संघ परिवारातून अशा विधानाचे खंडनही केले जात नाही. संविधान, तिरंगा झेंडा हे संघाला मान्य नाही त्यामुळे ते बदलण्याचा त्यांचा प्रयत्न सुरु आहे तो आजही कायम आहे.