
चिपळूण तालुक्यातील मोरवणे ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेत गावकऱयांनी एक महत्त्वपूर्ण आणि ऐतिहासिक ठराव एकमुखाने मंजूर केला. या ठरावानुसार गावातील जमीन गावातील व्यक्तीलाच विकणे बंधनकारक करण्यात आले आहे. गावातील जमीन गावाबाहेरील अथवा परजिल्ह्यातील व्यक्तीला विकता येणार नाही. एखाद्या कुटुंबाला पैशाची गरज भासल्यास ती जमीन फक्त गावातील व्यक्तीलाच विकावी लागेल.
गेल्या काही वर्षांत कोकणातील निसर्गरम्य गावांमधील जमीन परप्रांतीय लोक खरेदी करत आहेत. चांगले हवामान आणि परवडणाऱया दरात जमीन मिळत असल्याने बाहेरच्या लोकांनी मोठय़ा प्रमाणावर कोकणात जमिनी खरेदी केल्या. या खरेदीमुळे स्थानिकांच्या भविष्यातील पिढय़ांसाठी जमीन उरणार नाही, अशी भीती सातत्याने व्यक्त केली जात होती. मोरवणे ग्रामसभेच्या निर्णयामुळे या व्यवहारांना आळा बसणार आहे. ़
गावची जमीन गावातच राहणार
मोरवणे ग्रामसभेचा हा ठराव केवळ एक निर्णय नाही तर गावाच्या एकात्मतेचा आणि दूरदृष्टीचा पुरावा मानला जात आहे. गावकऱयांचे हक्क अबाधित ठेवत भविष्यातील पिढय़ांना शेती व घरजमिनींची कमतरता भासू नये, यासाठी ही पाऊले उचलली गेली आहेत. परिणामी ‘गावची जमीन गावातच’ ही संकल्पना प्रत्यक्षात आणण्याचा मार्ग मोकळा झाला असून स्थानिकांचे स्वाभिमानाचे हे एक भक्कम पाऊल ठरले आहे.
गावाचा सामाजिक समतोल बिघडतो
बाहेरचे लोक पैशाच्या जोरावर जमीन घेतात आणि गावाचा सामाजिक समतोल बिघडतो. स्थानिक तरुणांना शेतीसाठी किंवा घरे बांधण्यासाठी जागा उरत नाही. त्यामुळे हा ठराव अत्यावश्यक असल्याचे मत एकमुखाने मांडण्यात आले. अखेरीला सर्वानुमते हा ठराव मंजूर झाला.