पहिल्याच पावसात मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या काँक्रीट रस्त्याला भेगा; निकृष्ट दर्जाचे काम झाल्याचे स्पष्ट

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या कामाचे पितळ पहिल्याच पावसात उघडे पडले आहे. संगमेश्वर येथील शास्त्री पुलाजवळ, दानिश चायनीज सेंटरसमोरील नवीन काँक्रिट रस्ता खचल्याने आणि मोठ्या प्रमाणात भेगा पडल्याने महामार्गाच्या दर्जाबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. काही ठिकाणी रस्ता सरळ-सरळ दोन भागांत विभागला गेला आहे. त्यामुळे वाहनधारकांना प्रचंड अडचणींचा सामना करावा लागत आहे.

महामार्गाचे काम सुरू होऊन तब्बल 12 वर्षे उलटली तरी गुणवत्तेचा अभाव आणि ठेकेदार व प्रशासनाची बेफिकिरी यामुळे रस्त्याच्या अपूर्णतेने प्रवाशांचे जीवन धोक्यात आले आहे. दररोज होणारे अपघात, अपुरे सुरक्षाविधान आणि निकृष्ट दर्जाचे काम हे सातत्याने समोर येत असूनही कोणतेही ठोस पाऊल उचलले जात नाही, ही अत्यंत गंभीर बाब आहे.संगमेश्वर तालुक्यातील कुरधुंडा येथे आधीच संरक्षण भिंतीला तडे गेल्याचे समोर आले असताना, आता शास्त्री पुलाजवळील रस्त्याचे खचणे आणि त्याला मोठे तडे जाणे ही अजून एक चिंताजनक बाब आहे. यामुळे प्रशासन आणि ठेकेदारांच्या हलगर्जीपणावर बोट ठेवले जात आहे.

विशेष म्हणजे, रस्ता धोकादायक असल्याची माहिती असूनही ठेकेदार कंपनीने कोणतेही बॅरिकेट्स वा सूचनाफलक लावलेले नाहीत. त्यामुळे अवजड वाहनेही बेधडकपणे धोकादायक भागातून प्रवास करत आहेत. भविष्यात मोठा अपघात घडल्यास त्याची जबाबदारी कोण घेणार, असा संतप्त सवाल उपस्थित करण्यात आला.

दरड कोसळून वाहतूक ठप्प
सोमवारी संध्याकाळी उशिरा शास्त्री पुलाजवळ दरड कोसळून मोठे दगड आणि माती महामार्गावर आल्याने वाहतूक पूर्णतः ठप्प झाली. सुदैवाने त्याच वेळी रस्त्यावर कोणतेही वाहन नव्हते, अन्यथा मोठी दुर्घटना घडली असती. दरड कोसळल्यानंतर वाहने तडे गेलेल्या रस्त्यावरूनच दोन्ही बाजूंना वळवण्यात आली, त्यामुळे वाहतुकीचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. प्रशासन, लोकप्रतिनिधी व ठेकेदार कंपनी यांनी त्वरित या प्रकरणाकडे लक्ष देऊन कारवाई करावी, अशी जोरदार मागणी स्थानिक ग्रामस्थ आणि प्रवासी करत आहेत. अन्यथा उद्भवणाऱ्या दुर्घटनेसाठी जबाबदार कोण? हा प्रश्न जनतेच्या मनात निर्माण झाला आहे.