
महाराष्ट्राला मान्सूनपूर्व पावसाने झोडपले असून सलग तीन आठवडे पाऊस पडत होता. अवकाळी पावसाने शेतकऱ्यांना संकटात टाकले आहे. या संकटात त्याच्या पाठीशी सरकारने उभे राहिले पाहिजे. पंचनाम्याचे सोपस्कार बाजूला ठेवून सरकारने तातडीने हेक्टरी 50 हजार रुपयांची मदत करावी, अशी मागणी काँग्रेस वर्किंग कमिती सदस्य बाळासाहेब थोरात यांनी केली आहे.
मे महिन्यात काही पिके काढणीला येतात तेव्हाच पावसाने सर्व वाहून नेले, केळी, केसर आंबा फळांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यात भाजीपाला, टोमॅटो, कांदा, डाळिंब पिकाचेही नुकसान झाले आहे. घराची पडझड झाली. काही ठिकाणी पशुधन गेले, पावसामुळे जनावरांच्या चाऱ्याचाही प्रश्न निर्माण झाला आहे. खरिपाची तयारी सुरू असतानाच हे संकट ओढवल्याने आता शेतकऱ्यांकडे पैसे नाहीत. अवकाळीने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. कांद्याला एकरी 60 हजार रुपये खर्च येतो, तर टोमॅटोला एकरी 50 हजारांचा खर्च येतो. शेती करणे महाग झाले आहे. सरकारने अशा संकटावेळी शेतकऱ्याला भरीव मदत दिली पाहिजे, असे बाळासाहेब थोरात म्हणाले.
कर्जमाफी जाहीर करा
निवडणूक प्रचारावेळी भाजपा युतीच्या नेत्यांनी कर्जमाफी देण्याची घोषणा केली होती, पण सत्तेत आल्यानंतर त्यांना त्याचा विसर पडला. महाविकास आघाडी सरकार असताना शेतकऱ्याला सातत्याने मदत दिली, कर्जमाफी केली पण आताचे त्यावर बोलत नाही. केवळ कोरड्या घोषणा करण्याऐवजी सरकारने कर्जमाफी जाहीर केली पाहिजे, असे थोरात म्हणाले.