
>> नीलेश कुलकर्णी
तेलंगणाचे एकेकाळचे लोकप्रिय मुख्यमंत्री व भारत राष्ट्र समितीचे सर्वेसर्वा के. चंद्रशेखर राव यांचा पाय खोलात चालला आहे. तेलंगणा विधानसभा निवडणुकीत पक्षाचा सुपडा साफ झाल्यापासून राव यांचे ग्रहमान बिघडले आहे. राव यांचा पक्ष ताब्यात घेण्याचे भाजपचे मनसुबे रावांच्या कन्या के. कविता यांनी पिताश्री रावांना एक दीर्घ पत्र पाठवून उधळून लावले आहेत. तथापि राजकीय वारसाचा वादंग आणि राजकीय भवितव्याचा प्रश्न या कोंडीत राव सध्या सापडले आहेत.
भारत राष्ट्र समिती या आपल्या पक्षाच्या स्थापनादिवशी चंद्रशेखर राव यांनी आपल्या भाषणातून भाजप व केंद्रीय सरकारवर स्तुतीसुमने उधळल्याने राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना उधाण आले आहे. ‘एकेकाळी पंतप्रधान बनण्याचे स्वप्न पाहणारे राव इतके अगतिक का झाले?’ असा सवाल विचारला जाऊ लागला. त्यात भर पडली ती राव यांची कन्या कविता यांनी पाठविलेल्या पत्राने. या पत्रात कविता यांनी ‘‘माझ्यावर ईडीने कारवाई केली म्हणून त्या दबावाला बळी पडून तुम्ही भाजपला शरण गेला आहात काय?’’ असा बिनतोड सवाल केला. हे पत्र सार्वजनिक झाल्याने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली. ‘‘माझे बाबा देवमाणूस आहेत. मात्र त्यांना राक्षसांनी घेरलेले आहे’’, अशी टीकाही या पत्रात करण्यात आली आहे. ‘राक्षस’ ही उपाधी त्यांनी आपले सख्खे बंधू केटीआर यांना उद्देशून वापरल्याचे मानले जात आहे. राव यांनी आपला राजकीय वारसदार म्हणून चिरंजीव केटीआर यांची निवड जवळपास निश्चित केली आहे. ही निवड कविता व चंद्रशेखर रावांचे दुसरे पुतणे हरीश राव यांना मान्य नाही. त्यामुळे चंद्रशेखर राव हे कुटुंबकलहात पुरते हैराण झाले आहेत. चंद्रशेखर राव यांच्यासह आपले राजकीय पुनर्वसन करण्याच्या सेटलमेंटवर केटीआर यांनी आपला पक्ष भाजपमध्ये विलीन करण्याची तयारी दर्शविली होती. त्या बदल्यात केसीआर यांना केंद्रात मंत्रीपद, तर चिरंजीवांना राज्यात संघटनात्मक पद असे समीकरण ठरविण्यात आले होते. तेलंगणात भाजपने आपला पाया विस्तारायला सुरुवात केली आहे. मात्र त्याला काही मर्यादा आहेत. तेलंगणात काँग्रेसचे सरकार असल्याने विरोधी पक्षाची पोकळी भरून काढायची व पुढच्या विधानसभा निवडणुकीत भाजपचे सरकार सत्तेवर आणायचे, ही भाजपची त्यामागची रणनीती आहे. चंद्रशेखर राव चिरंजीवांसह भाजपमध्ये येत असतील तर ते भाजपसाठी फायद्याचेच आहे. त्यादृष्टीने पावलेही पडली. मात्र के. कविता यांनी विरोध केल्याने दिल्लीतली चाणक्य नीती तूर्तास फेल गेली आहे. अर्थात कविता यांनी खमकेपणाने केलेला विरोध किती काळ टिकतो हे पाहणे महत्त्वाचे राहील.
‘सिंदूर’ अभियानाचे बूमरँग
कोणत्याही योजनेचे व घोषणेचे श्रेय घेण्याचा राजकीय अधाशीपणाचा आजार भाजपला जडला आहे. मात्र ‘ऑपरेशन सिंदूर’चे श्रेय घेण्याचे बूमरँग भाजपच्या चांगलेच अंगाशी आले आहे. देशभरात 9 जूनपासून भाजपकडून सिंदूरचे घरोघर वाटप केले जाणार असल्याची बातमी देशातील एका अग्रगण्य हिंदी दैनिकाने दिली. सिंदूर अर्थात कुंकू हा विषय सौभाग्याचे प्रतीक असलेल्या कुंकवाशी निगडित असल्याने सोशल मीडिया व समाजात त्याविषयी तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. ‘भारतीय संस्कृतीत तर पत्नीच्या कुंकवाचा धनी हा तिचा पती असतो. असे असताना घरोघरच्या स्त्रियांना सिंदूर देण्याचा अधिकार भाजप व नरेंद्र मोदींना कुणी दिला?’ असा सवाल विचारला जाऊ लागला. हा मुद्दा लगोलग हाती घेत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधानांवर जोरदार टीका केली. त्यानंतर भाजपने संबंधित दैनिकावर दबाव टाकून 31 मे रोजी ही बातमी खोटी असल्याचा धादांत खोटा खुलासा करायला लावला. ‘खुलासा करा नाहीतर ईडी मागे लावू’ अशी धमकी दिली गेली. हे सगळे करण्यामागे सोशल मीडियातून फेक नरेटिव्ह रचणारे आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय अग्रभागी होती. या दैनिकाने दिलेली बातमी ही अगदीच कपोलकल्पित व खोटी होती हे एकवेळ मान्य केले तरी 28 मे रोजी बातमी आल्यानंतर 29 मे या दिवशी ममतादीदींनी त्यावर कडक टीका करेपर्यंत भाजपला त्याचे खंडन करावेसे का वाटले नव्हते? ‘ऑपरेशन सिंदूर’चे श्रेय आपण घेऊ हा भरवसा भाजपला होता. मात्र प्रत्येक स्त्राrच्या दृष्टीने अत्यंत पवित्र व संवेदनशील असलेल्या कुंकवाला भाजपने हात घातल्याने त्यांचा हात पोळला गेला.
कमल हसन यांना ‘लॉटरी’
दाक्षिणात्य अभिनेते कमल हसन यांना राज्यसभेची लॉटरी लागली आहे. तामीळनाडूचे राजकारण व सिनेक्षेत्राचे एक अनोखे नाते आहे. अनेक तामीळ स्टार्सनी सुरुवातीला प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत राजसिंहासनावरही राज्य गाजवलेले आहे. अण्णा दुराई, जयललिता, करुणानिधी ही त्याची वानगीदाखल काही उदाहरणे. कमल हसन या नेत्यांएवढे उत्तुंग नक्कीच नाहीत. एनएमएन नावाचा राजकीय पक्ष काढून हसन यांनी विधानसभा निवडणूक लढवली. मात्र त्यांच्या पक्षाला खातेही उघडता आले नाही. मात्र आता द्रमुकने त्यांचा राजकीय वनवास संपवला आहे. हसन आता राज्यसभेवर जातील. मात्र अडगळीत पडलेल्या हसन यांना राज्यसभेवर पाठविण्याची अशी काय मजबुरी द्रमुकची असेल, यावर चर्चा होत आहे. तामीळ सुपरस्टार रजनीकांत यांचा कल भाजपकडे असल्याचे मानले जाते. मध्यंतरी भाजपच्याच सांगण्यावरून त्यांनी एक राजकीय पक्ष काढला होता. मात्र कमल हसन यांच्याप्रमाणेच त्यांचीही राजकीय दुरवस्था झाली. दुसरे तामीळ स्टार थलपती विजय यांनी स्वतंत्र राजकीय पक्ष काढला आहे. त्यामुळे द्रमुककडे कोणी ‘स्टार’ नव्हता. तो शोध कमल हसन यांनी संपवला आहे. प्रख्यात दिवंगत अभिनेते विजयकांत यांच्या पत्नीऐवजी स्टॅलिन यांनी हसन यांना संधी देण्याचा निर्णय घेतला आहे. कन्नडवर जहरी टीका करून हसन यांनी हा निर्णय द्रमुकसाठी तरी फायदेशीर ठरेल असे संकेत दिले आहेत. कॉंग्रेसनेही हसन यांचे समर्थन केल्यामुळे त्यांच्या राज्यसभेचा मार्ग मोकळा झाल्यात जमा आहे. तथापि कन्नडवरील टीकेमुळे हा सोपा मार्ग काहीसा कटकटीचा बनला आहे.