
उच्च न्यायालयाने दिलेल्या दणक्यानंतर प्रशासन इन अॅक्शन मोडवर आले असून ठाण्यातील 33 बेकायदा बांधकामांवर आज हातोडा टाकण्यात आला. या कारवाईत पूर्ण इमारत, प्लिंथ, कॉलम, स्लॅब, वाढीव बांधकाम या प्रकारच्या बांधकामांचा समावेश आहे. महापालिकेच्या अतिक्रमणविरोधी पथकाने कारवाई केली असून यापुढेही प्रभाग समितीनिहाय अनधिकृत बांधकामांवर अशीच कारवाई सुरूच राहणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले. विशेष म्हणजे सीआरझेड क्षेत्रात उभारण्यात आलेले भंगाराचे गोडावूनही प्रशासनाने उद्ध्वस्त करून भूमाफियांना दणका दिला आहे.
बेकायदा बांधकामांमुळे ठाणे बदनाम झाले आहे. घोडबंदर, कोपरी, वर्तकनगर, कळवा, मुंब्रा आणि दिव्यात इमारती उभारण्याचा सपाटा सुरूच आहे. डायघर येथील खान कंपाऊंड परिसरात १७ बेकायदा इमारतीप्रकरणी उच्च न्यायालयाने काही दिवसांपूर्वी कठोर भूमिका घेतली. न्यायालयाने कान टोचल्यानंतर झोपलेल्या प्रशासनाला जाग आली आणि आयुक्तांसह पालिकेचे अधिकारी थेट रस्त्यावर उतरले. त्यानंतर सलग चार दिवस करवाई करत खान कंपाऊंडमधील १३ इमारतींवर कारवाई करण्यात आली. दस्तुरखुद्द पालिका आयुक्त सौरभ राव यांना बेकायदा बांधकामांच्या ठिकाणी जाऊन कारवाई करण्याची नामुष्की ओढवली होती.
प्रत्यक्ष पाहणीनंतर तत्काळ कारवाई
न्यायालयाच्या आदेशानंतर बेकायदा बांधकामांवर कारवाई करण्यासाठी प्रत्येक प्रभाग समिती क्षेत्रात सहाय्यक आयुक्त यांच्या नेतृत्वात विशेष पथकाची स्थापना केली आहे. या पथकांनी आपापल्या क्षेत्रातील अनधिकृत बांधकामांबाबतच्या तक्रारी आणि प्रत्यक्ष पाहणी करून तत्काळ कारवाई करण्याचे आदेश आयुक्त सौरभ राव यांनी दिले आहेत. ही कारवाई १९ आणि २० जून रोजी करण्यात आली.