पुन्हा एकदा शरद पवार-अजित पवार एकत्र, बंद दाराआड चर्चा

कृषी क्षेत्रात एआय तंत्रज्ञानाच्या वापरासंदर्भात आज साखर संकुल येथे झालेल्या बैठकीच्या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष ज्येष्ठ नेते शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि जयंत पाटील एकत्र आले. बैठक संपल्यानंतर तिघांमध्ये बंद दाराआड चर्चा झाली. काही वेळ तेथे कोणाला सोडण्यात आले नाही. त्यामुळे बैठकीत कोणती चर्चा झाली, याची उत्सुकता उपस्थितांमध्ये होती.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या फुटीनंतर अनेकदा काही कार्यक्रम आणि संस्थांशी संबंधित बैठकीच्या निमित्ताने शरद पवार आणि अजित पवार हे एकत्र येत आहेत. आज वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूच्या पुढाकाराने एआय तंत्रज्ञानासंदर्भातील बैठक होती. बैठकीला काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात, हर्षवर्धन पाटील, राजेश टोपे, दिलीप वळसे पाटील यांच्यासह साखर संघाचे पदाधिकारी उपस्थित होते.

बैठक संपल्यानंतर इतर नेते निघून गेले. मात्र, शरद पवार, अजित पवार आणि जयंत पाटील यांच्यात बंद दाराआड चर्चा झाली. त्यानंतर अजित पवार हे सहकार महामंडळाच्या अध्यक्षांच्या केबिनमध्ये जाऊन बसले. तर शरद पवार, जयंत पाटील सभागृहात थांबून होते. दरम्यानच्या काळात राजेश टोपे हे दोन्ही दालनांमध्ये ये-जा करत होते. बैठकीनंतर सुमारे अर्धा तास या दोन्ही ठिकाणी वर्दळ सुरू होती. अजित पवार निघून गेल्यानंतरदेखील जयंत पाटील बैठकीच्या ठिकाणी बराच वेळ बसून होते.

आता पुन्हा 9 जूनला…

आजच्या बैठकीनंतर पुन्हा एकदा 9 जून रोजी हे दोन्ही नेते वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या याच विषयावरील पुढील बैठकीच्या निमित्ताने एकत्र येणार असल्याचे सांगण्यात आले. यापूर्वी तीन बैठका झाल्या आहेत. बैठकीच्या निमित्ताने वारंवार बंद दाराआड उभयतांमध्ये चर्चा होत असल्याची माहिती देखील समोर येत आहे.

योगायोग की आणखी काही?

गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पूर्वी एकत्र येतील अशी चर्चा सुरू आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार आणि अजित पवार या दोन्ही नेत्यांनी वारंवार एकत्र येणे हा केवळ बैठकीतील योगायोग आहे की आणखी काही राजकीय खलबते यानिमित्ताने होत आहेत किंवा कसे याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.