
कल्याणमधील शिवकालीन इतिहासाची साक्ष सांगणाऱ्या शिवकालीन दुर्गाडी किल्ल्याच्या बुरुजाची तटबंदी आज ढासळली. या किल्ल्याच्या डागडुजीसाठी वारंवार मागणी करूनही पुरातत्त्व विभाग दुर्लक्ष करीत असल्याने नागरिकामध्ये संताप आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून दुर्गाडी किल्ल्याच्या देखभाल, दुरुस्तीचे काम सुरू आहे. संरक्षक भिंत आणि बुरुज डागडुजीचे काम निकृष्ट असल्याचा पंचनामाच भिंत कोसळल्याच्या निमित्ताने पुढे आल्याने इतिहासप्रेमींनी संताप व्यक्त केला.
गेल्या चार वर्षांपासून दुर्गाडी किल्ल्याची संरक्षक भिंत आणि बुरुज कोसळण्याच्या घटना वारंवार घडत आहेत. सध्या किल्ल्याच्या देखभाल, दुरुस्तीचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाकडून सुरू आहे. त्यासाठी सुमारे 10 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. मात्र या कामांदरम्यानच आज पहाटे किल्ल्याच्या तटबंदीचा मोठा भाग कोसळला. यामुळे प्रशासकीय हलगर्जीपणा समोर आला आहे.
घटनेनंतर शिवसैनिकांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. यावेळी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उपनेते विजय साळवी यांनी सरकारवर सडकून टीका केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना छत्रपती शिवरायांच्या किल्ल्यांकडे लक्ष देण्यास वेळ नाही. ते केवळ घाणेरड्या राजकारणात व्यस्त आहेत, अशी संतप्त प्रतिक्रिया त्यांनी दिली.
किल्ल्याचे मूळ स्वरूप कायम ठेवा!
दुर्गाडी किल्ला हा राज्य शासनाच्या मालकीचा असून देखभाल, दुरुस्तीची जबाबदारी जिल्हा प्रशासन आणि सार्वजनिक बांधकाम विभागावर सोपवण्यात आली आहे. न्यायालयानेही काही महिन्यांपूर्वी यासंदर्भात स्पष्ट निर्देश दिले आहेत. तरीही कामांची गती अत्यंत संथ आहे. किल्ल्याचे मूळ स्वरूप कायम ठेवून किल्याचे नूतनीकरण करावे, अशी मागणी उपनेते विजय साळवी यांनी केली आहे.