
गेल्या दोन आठवड्यांपासून जम्मू-कश्मीरमध्ये ढगफुटीमुळे दुर्घटनांचे सत्र सुरू आहे. ढगफुटी आणि भूस्खलनामुळे रामबन आणि रियासी या जिह्यांमध्ये शनिवारी 11 जणांचा मृत्यू झाला. त्यात एकाच कुटुंबातील सात जणांचा समावेश आहे. रियासी जिह्यातील बादेर गावात शनिवारी पहाटे भूस्खलन होऊन सात जणांचा मृत्यू झाला. रामबन जिह्यात ढगफुटीमुळे दोन घरे आणि एक शाळा कोसळून चार जण दगावले. त्यात दोन भावंडांचा समावेश आहे. या सर्वांचे मृतदेह हाती लागले असून, बचावकार्य सुरू असल्याचे रामबनचे उपायुक्त मोहम्मद खान यांनी सांगितले. दुर्घटनाग्रस्त नागरिकांना सर्वतोपरी मदत करण्यात येत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. रामबन जिह्यात भूस्खलनामुळे बिचलारी नदीच्या प्रवाहात अडथळे निर्माण झाल्याने नदीकाठच्या गावांना धोका निर्माण झाला आहे.