बिबटय़ाच्या हल्ल्यात बालकाचा मृत्यू, दिंडोरी हादरले

वनारवाडीत तरुणीच्या मृत्यूला महिना होत नाही, तोच दिंडोरीच्या जाधव वस्तीवर शनिवारी रात्री बिबटय़ाने हल्ला चढवत बालकाचा बळी घेतला, यामुळे हळहळ व्यक्त होत आहे. बिबटय़ांचा कायमस्वरुपी बंदोबस्त करावा, या मागणीसाठी संतप्त नागरिकांनी चार तास रास्ता रोको केला, पोलिसांच्या मध्यस्थीनंतर तो मागे घेण्यात आला. यानंतर तणाव निवळला.

निळवंडी रस्त्यावरील जाधव वस्ती येथील रुद्राक्ष अमोल जाधव (5) हा शनिवारी रात्री नऊच्या सुमारास आजोबा दत्तात्रय जाधव यांच्यासोबत घराबाहेर उभा होता. अंधारात दबा धरून बसलेल्या बिबटय़ाने झडप घालून रूद्राक्षला शेतात ओढून नेले. आजोबांनी आरडाओरड करताच शेजाऱ्यांनी धाव घेतली. शेतात शोध घेतला असता रुद्राक्षचा मृतदेह मिळून आला. परिसरात बिबटय़ाचा वावर वाढला असल्याने आधीच घबराट पसरली होती. आधी वनारवाडीत तरुणीचा आणि आता बालकाचा मृत्यू झाल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला, रात्रीच नाशिक-सापुतारा मार्ग रोखून धरला, यामुळे वाहतूक ठप्प झाली होती. दिंडोरी पोलीस ठाण्यातील अधिकारी, कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी समजूत काढल्यानंतर रहिवाशांनी आंदोलन मागे घेतले. परिसरात त्वरित पिंजरा लावावा, बिबटय़ांचा कायमस्वरुपी बंदोबस्त व्हावा, मृत मुलाच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत मिळावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली.

आज अधिकाऱ्यांनी लोकप्रतिनिधींसोबत बैठक घेतली. वनारवाडीतील हल्ल्यानंतर वनविभागाची शोध मोहीम अपयशी ठरली, तालुक्यात अनेक ठिकाणी पिंजरे लावले. वनविभागाने अनेक पिंजऱ्यात भक्ष्यच टाकले जात नाही, मग बिबटे पिंजऱ्यात कसे अडकतील, असा सवाल करण्यात आला. परिसरात शोध मोहीम राबवू, विविध उपाययोजनांचा प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयाकडे पाठवू, असे आश्वासन प्रादेशिक अधिकारी उमेश वावरे यांनी दिले. तालुक्यातील वाडय़ा-वस्त्यांवर अनेक ठिकाणी रात्री वीज पुरवठा बंद असतो, तो सुरळीत ठेवावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.