
पाच महिने उलटूनही बाजार समिती प्रशासनाने टोमॅटो आडत्याकडून उत्पादकांचे थकवलेले अडीच कोटी वसूल केलेले नाहीत. त्यामुळे सोमवारी पुन्हा एकदा शेतकऱ्यांनी कांदा लिलाव रोखला. प्रशासनाने ही रक्कम 20 जूनपर्यंत अदा करण्याचे आश्वासन दिल्यानंतर चार तासांनी आंदोलन मागे घेण्यात आले.
गुरुकृपा व्हेजिटेबल कंपनीच्या आडत्याने चार ते पाच महिन्यांपूर्वी तीनशे शेतकऱ्यांकडून टोमॅटो खरेदी केला. मात्र त्या बदल्यात अडीच कोटी रुपये दिलेले नाहीत. वारंवार फेऱ्या मारूनही कष्टाचे पैसे मिळत नसल्याने शेतकरी संतप्त झाले. त्यांनी आतापर्यंत तीनदा आंदोलनाचा पवित्रा उचलला होता. दरवेळी बाजार समितीने मध्यस्थी करीत पैसे मिळवून देण्याचे आश्वासन दिले. मात्र पैसे अजूनही मिळाले नसल्याने शेतकरी संतप्त झाले. त्यांनी बाजार समितीत धडक देत सोमवारी कांदा लिलाव बंद पाडले. पैसे मिळत नाहीत तोपर्यंत लिलाव सुरू होऊ देणार नाही, अशी भूमिका घेत आवारात ठिय्या मांडला, प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.
उपसभापती ज्ञानेश्वर शिरसाट यांनी संबंधित आडतदारासह शेतकऱ्यांची भेट घेतली. आडतदाराने पैसे देण्यासाठी जमीन विकल्याची कागदपत्रे दाखवली. 20 जूनपर्यंत सर्व रक्कम परत करण्याचे आश्वासन मिळाल्यानंतर दुपारी आंदोलन मागे घेतले.