
धारावी पुनर्विकासाच्या नावाखाली लाखो धारावीकरांना बेघर करून देवनारचे डम्पिंग ग्राऊड, मुलुंड, भांडुप मिठागरांच्या जमिनीवर फेकण्याचा डाव भाजप सरकारचा मालक असलेल्या अदानीने आखला आहे. मात्र धारावीकर, मुंबईकर हे होऊ देणार नाहीत. सर्व धारावीकरांना धारावीत 500 चौरस फुटांची घरे मिळाली पाहिजेत, तो त्यांचा हक्क आहे. हा लढा पक्षाचा नाही तर हा तुमचा, आमचा, मुंबईकरांचा लढा आहे. मुंबई वाचवण्यासाठी लढय़ात सहभागी व्हा. मात्र अदानी, राज्य सरकारने धारावीसह मुंबईच्या मुळावर येण्याचा प्रयत्न केला तर आम्ही नडणार, लढणार आणि जिंकणारसुद्धा, असा इशारा शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे यांनी दिला.
मुलुंडच्या कालिदास नाटय़गृहात आज ‘लढा आपल्या मुंबईचा’ यावर दिशा देण्यासाठी घेण्यात आलेल्या मार्गदर्शन बैठकीत आदित्य ठाकरे यांनी, हा केवळ धारावीकरांचा लढा नाही, तर मुंबईकरांचा लढा आहे. यात धारावीकरांसह मुंबईकरांनीही सहभागी व्हावे, असे आवाहन केले. या वेळी धारावी प्रकल्पाचे मुंबईकरांवर होणारे गंभीर दुष्परिणाम तसेच धारावी प्रकल्प आणि अदानीला देण्यात येणाऱया जमिनींबाबत सादरीकरण केले.
या वेळी शिवसेना नेते विनायक राऊत, शिवसेना नेते -आमदार अनिल परब, आमदार अजय चौधरी, सुनील राऊत, वरुण सरदेसाई, खासदार संजय दिना पाटील, आमदार महेश सावंत, मनोज जामसुतकर, बाळा नर, सुनील शिंदे, शिवसेना सचिव साईनाथ दुर्गे, उपनेते सचिन अहिर, अरुण दुधवडकर, विजय कदम, माजी आमदार प्रकाश फातर्पेकर, रमेश कोरगावकर, शिवसेना उपनेत्या किशोरी पेडणेकर, शीतल शेठ-देवरुखकर, विभाग संघटक श्रद्धा जाधव, सामाजिक कार्यकर्ते अॅड. सागर देवरे यांच्यासह पदाधिकारी तसेच सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
…हा भाजपच्या मालकाचा विकास
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी एसआरए योजना आणली. त्यामुळे गरीबांना हक्काची घरे मिळत आहेत. मात्र धारावी पुनर्विकासाच्या नावाखाली धारावीतील 550 एकरबरोबर मुंबईतील मोक्याच्या जागा अदानीला दिल्या जात आहेत. हा धारावीचा पुनर्विकास नाही, तर भाजपचा मालक असलेल्या अदानीचा विकास आहे.
अदानीसाठी धारावीकरांना हटवणार
महाविकास आघाडी सरकारमुळे वरळी, नायगाव बीडीडी पुनर्विकास प्रकल्पाअंतर्गत तिथे राहणाऱया प्रत्येकाला मोफत घरे मिळणार आहे. त्यांच्यापैकी कोणीही विस्थापित होणार नाही. पण भाजप सरकार एकटय़ा अदानीसाठी धारावीकरांना बाहेर काढणार आहे. मात्र आम्ही हे होऊ देणार नाही, असे आदित्य ठाकरे म्हणाले.
मी छातीचा कोट करून लढायला उतरलो आहे. हा लढा आपल्या मुंबईसाठी आणि महाराष्ट्रासाठी लढावाच लागणार आहे. एका मोर्चाने हा विषय संपणारा नाही. तुम्हाला घरोघरी जावं लागेल. आपण का लढतोय, कुणासाठी लढतोय हे लोकांना सांगावं लागेल. हा लढा ऐतिहासिक ठरेल.
या लढय़ात सहभागी व्हावेच लागेल!
गेल्या दोन-अडीच वर्षांत मुंबई आणि मुंबईकरांची प्रचंड लूट सुरू आहे. मुंबई महापालिकेचा 6 हजार 80 कोटींचा रस्ते घोटाळा, तोटय़ात असलेल्या मुंबई महापालिकेच्या मुदत ठेवी 80 हजार कोटींपर्यंत खाली आणल्या. भ्रष्टनाथ मिंधे हे पैसे आपल्या कंत्राटदार मित्रांना वाटत आहेत. बेस्ट बसच्या तिकिटांचे दर वाढवले गेले आहेत. माझ्या मुंबईला लुटून तुम्हाला श्रीमंत होता येणार नाही, असा इशारा देत मुंबई वाचवायची असेल तर मुंबईची लूट रोखण्याच्या या लढय़ात प्रत्येकाला सहभागी व्हावे लागेल, असे आवाहन आदित्य ठाकरे यांनी केले.
मिंधे गटातून कार्यकर्ते स्वगृही
मिंधे गटात गेलेले माजी शाखाप्रमुख संजय दळवी, प्रमोद कांबळे यांच्यासह त्यांचे सहकारी पुन्हा स्वगृही परतले. त्यांच्या हातावर शिवबंधन बांधून सर्वांचे आदित्य ठाकरे यांनी शिवसेनेत स्वागत केले. आदित्य ठाकरे यांनी मुंबई वाचवण्यासाठी जो लढा सुरू केला आहे त्याला साथ देण्यासाठी हे सर्वजण शिवसेनेत परतल्याचे यावेळी आमदार सुनील राऊत यांनी सांगितले.