मुंबईला जाण्यासाठी गणेशभक्तांची रेल्वे स्थानकांवर गर्दी

अकरा दिवसांच्या गणपतींचे विसर्जन करून रात्रीपासूनच गणेशभक्त, चाकरमान्यांनी मुंबईकडे जाणाऱ्या विशेष रेल्वे गाडय़ांसाठी सावंतवाडीसह विविध रेल्वे स्थानकांवर  गर्दी केली होती. त्यामुळे रेल्वे स्थानके भरून गेली होती. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर बाप्पाची सेवा केल्याचा आनंद दिसत होता.

गणेशोत्सवानिमित्त कोकणात आलेल्या मुंबईकर गणेशभक्तांनी, चाकरमान्यांनी अनंत चतुर्दशीच्या दिवशी आपल्या घरगुती तसेच मोठ्या मंडळांच्या बाप्पाला निरोप दिल्यानंतर शनिवारपासून मुंबईला परतू लागले आहेत. ’गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या!’ असा जयघोष करत भक्तिमय वातावरणात गणपतीचे विसर्जन करून त्यांनी परतीच्या प्रवासाला सुरुवात केली. अनंत चतुर्दशीपर्यंत गणेशोत्सव साजरा करणाऱया कोकणवासीयांसाठी कोकण रेल्वेने गणेशोत्सवासाठी विशेष गाडय़ा सुरू केल्या आहेत.