गणेशपूजेचे शास्त्र

मोहन दाते

गणपती हे संरक्षणाचे आणि मांगल्याचे प्रतीक असून पार्वतीने संरक्षणासाठीच त्याची स्थापना केली असल्याचे पुराणात सांगितले आहे. पृथ्वीपासून म्हणजे मातीपासून तयार केलेल्या गणेशमूर्तीचे आपण पूजन करतो, म्हणून त्याला पार्थिव मूर्ती असे म्हणतात. येणाऱ्या सर्व संकटांचे हरण करावे अशा संकल्पाने आपण गणेशाच्या मूर्तीची स्थापना आणि पूजा करत असतो. तसेच मांगल्याचे प्रतीक म्हणूनही गणपतीचे पूजन केले जाते. हे पूजन कसे करावे, षोडषोपचार पूजेचे महत्त्व काय, गणपतीला कोणती फुले वाहावीत आणि मुख्य म्हणजे यंदा पूजेसाठी मुहूर्त कोणता आहे हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे.

गणपती हा विघ्नहर्ता आहे, कोणत्याही संकटातून तो आपल्याला बाहेर काढू शकेल, अशी लोकांची श्रद्धा असते. त्यामुळे या उत्सवाला एक वेगळीच बहार येते. सर्व दैवतांमध्ये गणपतीचं पूजन अग्रामाने करावं असं शास्त्र सांगतं. त्यामुळे या आद्य दैवताच्या पूजेसाठी प्रत्येक जण मोठय़ा उत्साहाने तयार होत असतो. गणेश चतुर्थीच्या दिवशी महाराष्ट्रात घरोघरी गणपतीच्या पार्थिव मूर्तीची स्थापना मोठय़ा भक्तिभावाने केली जाते. गणपती हे संरक्षणाचे आणि मांगल्याचे प्रतीक असून पार्वतीने संरक्षणासाठीच त्याची स्थापना केली असल्याचे पुराणात सांगितले आहे. आपल्या घरातील गणपतीचे पूजन कसे करावे, षोडशोपचार पूजनाचे महत्त्व काय, ते कशा प्रकारे करावे, गणपतीची मूर्ती कशी असावी याबाबत अनेक भक्तांच्या मनात संभ्रम असतात. त्याबाबतच आपण जाणून घेऊ.

दरवर्षी भाद्रपद शुद्ध चतुर्थीला घरोघरी गणेशाची मूर्ती आणून त्याची स्थापना आणि पूजन केले जाते. हा पूजाविधी करण्यामागे एक पौराणिक कथा आहे. पार्वतीने गणपतीची स्थापना संरक्षणाच्या उद्देशाने केली होती. पार्वतीमाता स्नान करत असताना या गणपतीने संरक्षण करावे, कोणालाही आत येऊ देऊ नये अशी पार्वतीची आज्ञा असल्यामुळे भगवान शंकर आल्यावरही गणपतीने त्यांना प्रतिबंध केला. त्यामुळे शंकरांनी त्याचे मस्तक उडविले. पार्वतीने हे पाहिल्यानंतर तिचा शोक अनावर झाला आणि तिने शंकरांना सांगितले की, हा माझा स्थापित केलेला पुत्र होता. तेव्हा तुम्ही त्याला पुन्हा जिवंत करा. त्यावेळी शंकरांनी आपल्या गणांना आज्ञा देऊन प्रथम दिसेल त्याचे शीर्ष आणावयास सांगितले. गणांनी हत्तीचे शीर्ष आणले आणि ते शंकरांनी गणपतीच्या मृत शरीरावर बसवले. त्यानंतर गणपती हा ‘गजानन’ या अर्थाने प्रसिद्ध झाला.

पृथ्वीपासून म्हणजे मातीपासून तयार केलेल्या गणेशमूर्तीचे आपण पूजन करतो, म्हणून त्याला पार्थिव मूर्ती असे म्हणतात. येणाऱ्या सर्व संकटांचे हरण करावे अशा संकल्पाने आपण गणेशाच्या मूर्तीची स्थापना आणि पूजा करत असतो. तसेच मांगल्याचे प्रतीक म्हणूनही गणपतीचे पूजन केले जाते. हे पूजन किती दिवस करावे याबाबत अनेकांच्या मनात शंका असते. ज्यांच्याकडे परंपरेने जितके दिवस हा उत्सव असेल तितके दिवस रोज त्याची पूजा करावी. काहींच्या घरी दीड दिवसाचा, काहींच्या घरी पाच दिवसांचा, काहींच्या घरी गौरींबरोबरचा, तर काहींच्या घरी दहा दिवसांचा गणपती असतो. जेवढे दिवस गणपती घरात असेल तेवढे दिवस दररोज नित्यनियमाने सकाळ-संध्याकाळ त्याची पूजाअर्चा, आरती अवश्य करावी. नैवेद्य दाखवून प्रसाद घ्यावा.

मूर्ती कशी असावी? 

घरी स्थापन करण्यासाठी मूर्ती आणली जाते, तेव्हा ती वीतभर म्हणजे 6 ते 8 इंच उंचीची असावी. ती आसनस्थ म्हणजे दोन्ही पायांची मांडी घातलेली असावी किंवा एक पाय खाली सोडलेला असावा. मूर्तीची मुद्रा सुबक आणि प्रसन्न दिसणारी असावी. विशेषत गणपतीचे डोळे शांत आणि प्रसन्न असावेत. कारण डोळ्यांमध्येच सगळे भाव असल्यामुळे ते जर सुबक असतील तर संपूर्ण मूर्ती सुबक आणि संपन्न वाटते. गणपतीला गळ्यात हार घालता येईल अशा प्रकारची मूर्ती असावी. अन्यथा काही ठिकाणी हात कानाला चिकटलेले असतात. अशा वेळी हार घालता येत नाही. मूषक हे गणपतीचे वाहन असल्यामुळे त्याचे पायाशी चित्र असावे. तसेच हातात फूल, मोदक, एक हात आशीर्वादासाठी आणि एका हातात शस्त्र असावे. ही मूर्ती मातीची अथवा शाडूची असावी.

गणेशाची मूर्ती बनवताना एखाद्या मूर्तिकाराने मूर्तीची सोंड उजवीकडे वळवलेली असते. काही जणांच्या मनात याबाबत थोडासा संभ्रम आहे, परंतु गणपतीची सोंड डावीकडे असावी की उजवीकडे असावी या पाठीमागे कोणतेही चांगले अथवा वाईट कारण नाही. समर्थ रामदासांनी गणपतीचे वर्णन करताना ‘सरळसोंड पातुंड त्रिनयना’ असे वर्णन केले आहे. त्यामुळे उजवीकडे किंवा डावीकडे सोंड वळलेली असली तरी त्यामुळे काही बिघडत नाही. मूर्तीचे पूजन करून आपला जो संकल्प आहे त्याची सिद्धी व्हावी याच हेतूने पूजा केली जाते. त्यामुळे डावीकडे सोंड असलेला गणपती मवाळ आणि उजवीकडे सोंड असलेला गणपती कडक असा विचार भाविकांनी मनात आणू नये.

पूजा कशी करावी? 

पूजा हा एक उपचार असतो. त्यामध्ये भक्तिभाव हा महत्त्वाचा आहे. आपण जेव्हा गणपतीची मूर्ती आणतो तेव्हा त्या मूर्तीमध्ये देवत्व येण्यासाठी प्राणप्रतिष्ठेचे मंत्र म्हणून आवाहन केले जाते. स्नान, पंचामृत स्नान, उष्णोदक स्नान, अथर्वशीर्ष म्हणून अभिषेक यावेळी केला जातो. हे सर्व करताना गणेशाची मूर्ती पार्थिव असल्यामुळे फुलांनी पाणी शिंपडून हे उपचार करावेत.  गणपतीचं आगमन होतं त्या दिवशी त्याची षोडशोपचार पूजा झाली पाहिजे. नंतर मात्र पंचोपचार पूजा केली तरी चालते. षोडषोपचारे पूजा म्हणजे आवाहन, आसन, पाद्यस्नान, अर्घ्यस्नान, स्नान, पंचामृत स्नान, अत्तर लावून उष्णोदक स्नान, अभिषेक, गंध, अक्षता, हळदकुंकू, वस्त्र, सुगंधी द्रव्ये म्हणजे अष्टगंध, शेंदूर इत्यादी, फुले-हार, विविध प्रकारची पत्री, दुर्वांची जुडी, तुळशीची पाने, धूप, दीप, नैवेद्य इत्यादी प्रकारे हे पूजन केले जाते.

दुर्वांचं महत्त्व 

गणपतीला दुर्वा फार प्रिय आहेत. त्यामागेही एक कथा आहे. पुराणकाळात अंगारक नावाचा एक राक्षस होता. ती देवांना फार त्रास देत असे. त्या राक्षसाचा गणपतीने संहार केला. या संहारानंतर गणपतीला बराच त्रास होऊ लागला. कोणत्याही गोष्टीने तो शमेना. यावर बरेच उपाय करण्यात आले, पण गणपतीचा त्रास काही कमी होत नव्हता. यावर ऋषीमुनींनी एक उपाय केला. त्यांनी दुर्वा तोडून त्याचा भारा गणपतीच्या मस्तकावर ठेवला. दुर्वा या शीतल असतात. त्यामुळे गणपतीच्या अंगाचा दाह कमी झाला. त्यामुळे गणपतीला दुर्वा या प्रिय आहेत. त्यामुळे त्याच्या पूजेच्या वेळी त्या गणपतीला अवश्य वाहाव्यात. मंदाराच्या झाडामध्ये गणपतीचा वास असतो, असं शास्त्र सांगतं. हे झाड गणपतीला फार प्रिय आहे. त्यामुळे मंदाराची फुलं वाहून गणपतीची पूजा करावी. याशिवाय जास्वंदीचं फूलही गणपतीला प्रिय आहे. त्याचाही पूजेमध्ये समावेश असावा.

मूर्तीचे पूजन करून आरती, मंत्रपुष्पांजली म्हटल्यानंतर घरातील सर्वांनाच एका प्रसन्नतेचा आनंद अनुभवायला मिळतो. षोडशोपचार पूजनाचे महत्त्व खूप आहे. सर्व उपचार पद्धतीमध्ये ती उत्तम आहे. देवत्व येण्यासाठी यातील सर्व उपचारांचा समावेश करणे अपेक्षित आहे. असे पूजन करताना म्हटलेल्या मंत्रांनीच मूर्तीमध्ये देवत्व येते आणि नंतर हे देवत्व मंत्रांनीच काढून ती विसर्जित केली जाते. गणपतीच्या पूजेमुळे आपल्यावरील संकटं दूर होतात, अशीही श्रद्धा आहे. कोणतंही संकट नसेल तरी गणपतीची तेवढय़ाच सश्रद्ध मनाने पूजा केल्यामुळे येणारी संकटं दूर होतात असं मानलं जातं.

शेवटचा एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे काही पंचांगांची गणित पद्धती भिन्न असल्यामुळे वर्षभरातील काही सणावारांमध्ये एक दिवसाचा फरक येत असतो. अशा वेळी सणाच्या काही दिवस आधी लोकांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचे काम गेल्या काही वर्षांपासून केले जात आहे. त्याकडे दुर्लक्ष करावे. ‘धर्मसिंधु’ या ग्रंथात दिलेला गणेश चतुर्थी निर्णय – पूर्वदिने एकदेशेनमध्यान्हव्यापिनी परदिने संपूर्ण मध्यान्हव्यापिनी तदा परैवतथा भौमवार योग प्रशस्ता… (‘धर्मसिंधु’ – गणेश चतुर्थी निर्णय). यंदा 18 सप्टेंबर रोजी तृतीया समाप्ती दुपारी 12.40 वाजता असून दुसऱ्या दिवशी चतुर्थी समाप्ती दुपारी 13.45 वाजता आहे. वरील शास्त्रविवेचनानुसार 19 सप्टेंबर 2023 रोजी चतुर्थी संपूर्ण मध्यान्हव्यापिनी असल्याने आणि मंगळवार असल्याने या दिवशी पंचांगात दिलेली श्रीगणेश चतुर्थी योग्यच आहे. यापूर्वी 26 ऑगस्ट 1998 रोजी अशीच परिस्थिती असताना याच पद्धतीने निर्णय केलेला होता. शृंगेरीच्या पू. शंकराचार्यांनी प्रत्यक्ष भेटीत आणि पू. गणेश्वर द्रविडशास्त्राr यांनी डोंबिवली येथील सभेत मत मांडताना पंचांगविषयक मतमतांतरे राहणार आहेत. म्हणून आपण जे पंचांग नेहमी वापरत आहात, त्याप्रमाणे आचरण करण्यास सांगितले आहे. तेव्हा मंगळवारी अंगारक योगावर गणपती स्थापना करणे योग्य होईल.

जेवढे दिवस आपल्या घरात गणपतीचा उत्सव असेल तेवढे दिवस भावपूर्ण पद्धतीने त्याचे पूजन करून शेवटच्या दिवशी संध्याकाळी पूजा करून नैवेद्य दाखवून उत्तरपूजेचे मंत्र म्हणावेत. मगच मूर्तीचे विधीवत विसर्जन करावे. गणपती ही मांगल्याची देवता असल्यामुळे या कालावधीत सर्वत्र, घराघरात अतिशय आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण दिसून येते. महाराष्ट्रात असंख्य गणेशभक्त आहेत. त्या सर्व गणेशभक्तांना गणपती उत्सवाच्या अनेक शुभेच्छा!

(लेखक पंचांगकर्ते आहेत.)