
पावसाळ्यातील केस गळती ही फार मोठी समस्या आहे. पावसात केस भिजल्यामुळे ते गळण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात वाढते. केवळ स्त्रियांमध्येच नाही तर, मुलांमध्येही केसगळती फार मोठ्या प्रमाणात वाढू लागली आहे. त्यामुळेच केसांसाठी नेमकं काय वापरावं हा विचार करत असाल तर, पावसाळ्यामध्ये शक्यतो केसांसाठी घरगुती मास्क लावणं हे खूपच फायदेशीर ठरतं. आपल्या प्रत्येकाच्या घरात अंडी असतात, अंडी ही आपल्या केसांना तुटण्यापासून तसेच गळण्यापासून रोखतात. अंडी आपल्या शरीराला पोषण देतात, त्याचसोबत आपल्या त्वचेसाठी आणि केसांसाठी सुद्धा खूप फायदेशीर आहे.
अंडी आणि मध
मध हे केसांसाठी खूप पोषक मानले जाते. म्हणूनच अंडं आणि मध हे उत्तम काॅम्बिनेशन मानलं जातं. याकरता दोन अंड्यांमध्ये दोन चमचे मध घाला, ते चांगले फेटून घ्या आणि ते तुमच्या केसांना लावावे. अंडी त्याच्या प्रथिनांनी केसांना मजबूत करेल आणि मध केसांना चांगले मॉइश्चरायझ करेल. ज्यामुळे तुमचे केस खूप मऊ मुलायम होतील.
अंडी आणि आवळा
आवळा केवळ सूपरफूड नाही तर, आवळा हा केसांसाठी टाॅनिक म्हणून काम करतो. आवळा पावडर ही केसांसाठी खूप महत्त्वाची आणि उपयोगी ठरते.
दोन अंडी नीट फेटून त्यात एक चमचा आवळ्याची पावडर घालावी. त्यानंतर केसांना मुळांपासून वरपर्यंत व्यवस्थित हा मास्क लावावा. यामुळे तुमचे केस जलदगतीने वाढण्यास मदत होईल. तसेच केस मुळांपासून मजबूत आणि नैसर्गिक काळेपणा येईल आणि केस जाडही होतील.
अंडी, व्हिटॅमिन ई आणि नारळ तेल
घरी असताना एखाद्या अंड्यात साधे खोबरेल तेल घातले तरीही, त्याचा खूप फायदा होतो. सुकं खोबरं हे आहारातून असो किंवा तेलाच्या माध्यमातून असो केसांसाठी फारच पूरक आहे. अंड्यात व्हिटॅमिन ई आणि खोबरेल तेल पूर्णपणे मिसळून ते केसांसाठी खूप फायदेशीर ठरते. हा हेअर मास्क निर्जीव केसांना जिवंतपणा देण्याचे काम करतो. यामुळे स्प्लिट एंड्सची समस्या देखील दूर होते.