भाजप पक्ष फोडणारी चेटकीण! काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा हल्ला

शेकडो काँग्रेस नेते भाजपमध्ये येण्यासाठी उत्सुक असल्याचे विधान भाजपचे प्रदेशाध्यक्ष तसेच महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले होते. बावनकुळे यांच्यावर जोरदार पलटवार करताना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी ‘भाजप पक्ष फोडणारी चेटकीण’ असल्याचे म्हटले आहे.

काँग्रेसच्या वतीने परभणीत सद्भावना यात्रा काढण्यात आली. या यात्रेत काँग्रेसचे राज्य प्रभारी रमेश चेनिथला, आमदार विजय वडेट्टीवार, प्रणिती शिंदे, सतेज पाटील आदी सहभागी झाले होते. यानिमित्ताने काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी पत्रकारांशी संवाद साधताना भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर जोरदार पलटवार केला. ‘भाजप हा दुसऱयाचे घर पह्डणारा पक्ष आहे. मुळात भाजप म्हणजे पक्ष फोडणारी चेटकीण आहे’ असा टोला त्यांनी लगावला.

सामाजिक सलोखा निर्माण करणारी पदयात्रा

काँग्रेसची सद्भावना पदयात्रा ही सकारात्मक वातावरण निर्मितीसाठी असल्याचे पक्षाचे राज्य प्रभारी रमेश चेनिथला यांनी सांगितले. ही यात्रा राजकीय नसून सामाजिक सलोख्यासाठी उचललेले पाऊल असल्याचेही ते म्हणाले.

भाजपला घरे फोडण्याची सवय लागलीय

भाजपला दुसऱ्यांची घरे फोडण्याची सवयच लागली असल्याची टीका आमदार विजय वडेट्टीवार यांनी केली. दुसऱयाच्या घराच्या विटा, लोखंड चोरून स्वतःचे घर बांधण्यात कसली आलीय कर्तबगारी? असा टोलाही त्यांनी लगावला. काँग्रेस हा कधीही न संपणारा विचार असल्याचेही ते म्हणाले.

काँग्रेस पक्ष खाली करणं हे मकाऊतल्या पॅसिनोतल्या गेमसारखं वाटतं का?

काँग्रेस पक्ष खाली करणं हे मकाऊमधल्या पॅसिनोतल्या गेमसारखं वाटतं का? एका रात्रीत काँग्रेस खाली होईल? असं त्यांना वाटत असेल तर तो त्यांचा गैरसमज आहे, अशा शब्दांत कॉँग्रेस नेत्या वर्षा गायकवाड यांनी भाजप प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर हल्ला चढवला.

कॉँग्रेस पक्ष फोडा, कॉँग्रेस रिकामी करा, असे वक्तव्य बावनकुळे यांनी भाजप पदाधिकाऱयांच्या मेळाव्यात बोलताना केले होते. त्यांच्या या वक्तव्याबाबत कॉँग्रेस नेत्या वर्षा गायकवाड यांनी तीव्र संताप व्यक्त केला. पक्ष संपवण्याची भाषा कोणी करू नये, बावनकुळे यांचं बोलणं हे उर्मटपणाचं, मस्तीचं उदाहरण आहे. माणसाने बोलत असताना विचार करून बोललं पाहिजे. याआधीसुद्धा त्यांच्या नेत्यांनी काँग्रेसमुक्त भारत करायचा असं म्हटलं होतं. चारशे पारचे स्वप्न पाहणारे 240 वर थांबले. महाराष्ट्रातसुद्धा खासदार किती निवडून आले ते बघा, असा पलटवार वर्षा गायकवाड यांनी बावनकुळे यांच्या वक्तव्यावर केला.

बावनकुळे काय म्हणाले होते?

कॉँग्रेस पक्षाला कोणतेही धोरण नाही. त्यामुळे कॉँग्रेसला सोडून लोक चालले आहेत. कॉँग्रेस पह्डा आणि रिकामी करा, काँग्रेस पार्टी जेवढी तुम्ही कमी कराल तेवढा तुमचा फायदा आहे, असा सल्ला चंद्रशेखर बावनकुळे यांनी पुण्यात भाजप पदाधिकाऱयांना मार्गदर्शन करताना दिला.