
अधिक गुण मिळूनही प्राथमिक निवड यादीत नाव नसल्याने एका उमेदवाराने उच्च न्यायालयाचे दार ठोठावले आहे. याची गंभीर दखल घेत न्यायालयाने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला(एमपीएससी) नोटीस जारी केली आहे.
उज्ज्वला वानखेडे यांनी ही याचिका केली आहे. मला 166 गुण मिळाले असूनही प्राथमिक निवड यादीत माझे नाव नाही. 148 गुण मिळालेल्याचे नाव प्रतीक्षा निवड यादीत आहे. ई-मेलद्वारे याची तक्रार एमपीएससीकडे केली. यासाठी एमपीएससी कार्यालयाशी संपर्क साधला. एमपीएससीने याचे काहीच उत्तर दिले नाही, असा आरोप याचिकेत करण्यात आला आहे. न्या. डॉ. नीला गोखले व न्या. फिरदोश पुन्नीवाला यांच्या सुट्टीकालीन खंडपीठासमोर या याचिकेवर सुनावणी झाली. या याचिकेचे प्रत्युत्तर सादर करण्याचे आदेश देत न्यायालयाने ही सुनावणी 10 जून 2025 पर्यंत तहकूब केली. न्यायपालिकेतील पदांसाठी एमपीएससीने मार्चमध्ये परीक्षा घेतली. त्याचा प्राथमिक निकाल मेमध्ये जाहीर करण्यात आला. अधिक गुण मिळूनही निवड यादीत नाव नसल्याने वानखेडे यांनी ही याचिका केली आहे.