हायकोर्टाची मध्य रेल्वेला चपराक, अपघाती मृत्यूची 8 लाख नुकसानभरपाई देण्याचे आदेश

लोकल अपघातात मृत्युमुखी पडलेल्या प्रवाशाच्या कुटुंबीयांना आठ लाख रुपये नुकसानभरपाई देण्याचे आदेश उच्च न्यायालयाने मध्य रेल्वेला दिले आहेत. कांजुरमार्ग ते मुलुंड प्रवासात लोकलमधून पडून या प्रवाशाचा मृत्यू झाला. त्याच्या कुटुंबीयांनी नुकसानभरपाईसाठी अर्ज केला. रेल्वे अपघात न्यायाधिकरणाने नुकसानभरपाई नाकारली. त्याविरोधात ज्योती दुराफे व अन्य यांनी याचिका केली होती.

न्या. शर्मिला देशमुख यांच्या एकल पीठासमोर या याचिकेवर सुनावणी झाली. मृत्युमुखी पडलेल्या प्रवाशाकडे लोकल प्रवासाचे तिकीट नव्हते. त्यामुळे तो अधिकृत प्रवासी नव्हता. त्याच्या कुटुंबीयांना नुकसानभरपाई देता येणार नाही, असा दावा रेल्वेने केला. हा दावा न्यायालयाने फेटाळून लावला. मृत प्रवाशाकडे तिकीट नव्हतेच हे सिद्ध करण्याची जबाबदारी रेल्वेची आहे. पीडिताच्या कुटुंबावर ही जबाबदारी ढकलता येणार नाही, असे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे. परिणामी संबंधित कुटुंबाला आठ लाख रुपये नुकसानभरपाई रेल्वेने द्यावी, असे न्यायालयाने आदेशात नमूद केले.

व्याज द्यावे लागेल

आठ आठवड्यांत रेल्वेने नुकसानभरपाई द्यावी. या काळात नुकसानभरपाई न दिल्यास त्यावर सहा टक्के व्याज ही रक्कम देईपर्यंत रेल्वेला द्यावे लागेल, असेही न्यायालयाने सांगितले आहे.