
प्रयागराज येथील महाकुंभमेळ्यात झालेल्या चेंगराचेंगरीत मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांना नुकसानभरपाई देण्यास विलंब झाल्याप्रकरणी अलाहाबाद उच्च न्यायालयाने योगी सरकारच्या ढिसाळ कारभारावरून ताशेरे ओढले. सरकारने भरपाई जाहीर केल्यानंतर ती वेळेवर पीडितांपर्यंत पोहोचवणे हेदेखील सरकारचे कर्तव्य आहे, असे न्यायालय म्हणाले.
उदय प्रताप सिंह यांनी दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करताना न्यायमूर्ती सौमित्र दयाल सिंह आणि संदीप जैन यांच्या खंडपीठाने राज्य सरकारची कानउघाडणी केली. सरकारी वैद्यकीय महाविद्यालयात शवविच्छेदन न करता चेंगराचेंगरीतील पीडितेचा मृतदेह तिच्या कुटुंबाकडे सोपवण्यात आल्याबद्दलही न्यायालयाने यावेळी चिंता व्यक्त केली. चार महिने उलटून गेले आहेत आणि राज्य सरकारने जाहीर केलेल्या भरपाईचा कोणताही भाग याचिकाकर्त्याला देण्यात आलेला नाही हे चिंताजनक आहे, असे न्यायालय म्हणाले.