हैदराबाद बस अपघात प्रकरण, राज्य मानव आयोगाने दखल घेत मागवला अहवाल

हैदराबादमधील चेवेल्ला येथे झालेल्या भीषण बस अपघातात 19 जणांचा जीव गेला होता. या घटनेमुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. या घटनेची तेलंगणा मानवाधिकार आयोगाने दखल घेतली आहे. या अपघातानंतर आयोगाने तत्परतेने हालचाल करत ‘सिस्टिम फेल्युअर’चे चित्र समोर आणले आहे. आयोगाने मंगळवारी या प्रकरणाची दखल घेत अपघातात मृत्यू झालेल्या 19 जणांच्या संदर्भात संबंधित अधिकाऱ्यांकडून सविस्तर अहवाल मागवला आहे.

माध्यमांच्या अहवालांचा उल्लेख करत आयोगाने चेवेल्ला–तांडूर मार्गाला ‘मृत्यूचा कॉरिडॉर’ असे संबोधले आहे, कारण रस्त्याची खराब स्थिती, मध्यविभाजकाचा अभाव, अतिवेग, ओव्हरलोडिंग आणि महामार्गाचे अरुंदपण या कारणांमुळे या मार्गावर वारंवार जीवितहानीची भीषण दृश्ये पाहायला मिळतात. आयोगाने स्पष्ट केले की या अपघातांमध्ये प्रशासनाची निष्काळजीपणा, अंमलबजावणी यंत्रणेचे अपयश आणि संबंधित विभागांची जबाबदारी न पाळणे हे मुख्य घटक आहेत, जे संविधानातील कलम 21 अंतर्गत संरक्षित ‘जीवन व सुरक्षिततेच्या अधिकाराचे’ सातत्याने उल्लंघन आहे.

आयोगाने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI), तेलंगणा राज्य परिवहन महामंडळ (TSRTC), परिवहन विभाग, गृह विभाग, खनन व भूविज्ञान विभाग आणि रंगा रेड्डी जिल्हाधिकारी यांना 12 डिसेंबरपर्यंत प्रत्यक्ष घटनांवर आधारित आणि केलेल्या कारवाईबाबतचा अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. हे निर्देश महत्त्वाचे मानले जातात कारण या मार्गावर मागील काही वर्षांपासून अपघातांची मालिका थांबलेली नाही. या मार्गावर आधुनिक पायाभूत सुविधा, रुंदीकरण आणि योग्य देखरेखीचा स्पष्ट अभाव आहे. आयोगाने राज्य प्रशासन आणि संबंधित विभागांना थेट आव्हान दिले आहे की फक्त दुःख प्रकट करणे पुरेसे नाही, प्रत्यक्ष कारवाई दिसली पाहिजे.