
हिंदुस्थानी सैन्याला आणखी चार दिवस मिळाले असते तर, पीओकेसोबत कराची आणि लाहोरही घेतलं असतं, असं शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत म्हणाले आहेत. नाशिकमध्ये पत्रकारांशी संवाद साधताना ते असं म्हणाले म्हणाले आहेत.
आज परराष्ट्र मंत्रालयाने पत्रकार परिषद घेत पीओकेने पाकिस्तानवरील ताबा सोडावा असं म्हटलं होतं. याच संदर्भात पत्रकारांनी त्यांना प्रश्न विचारला असता संजय राऊत म्हणाले की, “तुम्ही युद्ध कशासाठी पुकारलं? हिंदुस्थानी सैन्याला आणखी चार दिवस मिळाले असते तर, पीओकेसोबत कराची आणि लाहोरही घेतलं असतं. मात्र डोनाल्ड ट्रम्प यांच्या दबावामुळे सरकारने कच खाली. पीओके मागताना तुम्ही ट्रम्प यांना विचारलं का? यापुढे ट्रम्प काय ट्वीट करतात हे आम्हाला पाहावं लागेल.”
‘महानगरपालिका निवडणूक शिवसेना पूर्ण ताकदीने लढणार’
यावेळी राज्यातील महानगरपालिका निवडणुकांच्या मुद्द्यावर भाष्य करताना संजय राऊत म्हणाले की, “नाशिकपासून ते धुळे, मालेगावपर्यंत आणि उत्तर महाराष्ट्रातल्या सर्व महानगरपालिका शिवसेना ताकदीने लढणार. नाशिक महत्त्वाचे आहे, पण धुळे, मालेगाव, जळगाव या उत्तर महाराष्ट्रातील महत्त्वाच्या महानगरपालिका आहेत. फक्त मुंबई आणि ठाणे नाही तर, या सुद्धा महानगरपालिका आम्हाला ताकदीने लढवाव्या लागतील. पुढील चार महिन्यात या निवडणूक घ्याव्यात, असं सुप्रीम कोर्टाने सांगितलं आहे. त्यानुसार प्रत्येक महानगरपालिकेची बांधणी, पदाधिकाऱ्यांना त्यासंर्दभात सूचना, मार्गदर्शन हे केलं जात आहे. अलीकडेच नाशिकमध्ये मोठं शिबीर झालं. आता याच पद्धतीने सगळ्या महानगरपाकिकांमध्ये अशा प्रकारचे शिबीर होणार.”
‘जातीयवादी आणि धर्मांत शक्तींबरोबर शरद पवार जाणार नाहीत’
शरद पवार हे अजित पवार यांच्यासोबत जातील, त्यांचे विचार बदलले आहेत, असं म्हणत पत्रकारांनी संजय राऊत यांना प्रश्न विचारला असता ते म्हणाले की, ही चर्चा तुम्ही करताय. त्यांच्या एक मुलाखतीवरून तुम्ही सुतावरून स्वर्ग गाठला. आम्ही सुद्धा त्यांच्यासोबत अनेक वर्ष काम करत आहोत, त्यामुळे त्यांच्या भूमिका आम्हाला माहित आहे. जातीयवादी आणि धर्मांत शक्तींबरोबर शरद पवार जाणार नाहीत. ज्या विचारांसाठी त्यांनी आतापर्यंत संघर्ष केला आहे, अनेक वर्ष विरोधी पक्षात राहिले. त्या महाराष्ट्रद्रोही शक्ती आहेत. ज्यांनी त्यांचाही पक्ष फोडला आणि आमचाही पक्ष फोडला. अशा शक्तींबरोबर ते जाणार नाही. ज्यांना जायचं होतं, ते निघून गेले. ते तिथे सुधी आहेत का? अजितबात नाही.”