
हिंदुस्थानी हवामान खात्याने (IMD) महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांसाठी 27 जून 2025 साठी मुसळधार पावसाचा इशारा जारी केला आहे. रायगड जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे, तर मुंबई, ठाणे आणि पालघर जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. या इशाऱ्यामुळे नागरिकांना सतर्क राहण्याचे आणि आवश्यक खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
रायगड जिल्ह्यात उद्या अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. ऑरेंज अलर्टमुळे स्थानिक प्रशासनाला पूरपरिस्थिती, पाणी साचणे आणि भूस्खलन यांसारख्या संभाव्य धोक्यांबाबत तयारी ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. रायगडमधील नदीकाठच्या भागात राहणाऱ्या नागरिकांना विशेष काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मुंबई, ठाणे आणि पालघर जिल्ह्यांमध्येही जोरदार पावसाची शक्यता आहे.
हवामान खात्याने नागरिकांना अनावश्यक प्रवास टाळण्याचा सल्ला दिला आहे. तसेच, नदी, नाले आणि पूरप्रवण भागांपासून दूर राहण्याचे आवाहन केले आहे. मुंबईतील रेल्वे आणि रस्ते वाहतुकीवरही पावसाचा परिणाम होण्याची शक्यता आहे, त्यामुळे प्रवाशांना रेल्वे वेळापत्रक पाहूनच घराबाहेर पडा, असा सल्ला देण्यात आला आहे.