
टी-20वर्ल्ड कप आता अखेरच्या टप्प्यात आला आहे आणि वानखेडेवरचा हिंदुस्थान-इंग्लंड उपांत्य सामना म्हणजे जणू क्रिकेटचा महासंग्राम ठरणार आहे. मुंबईत पावसाची एक टक्काही शक्यता नाही, असे हवामान खाते सांगत असले तरी क्रिकेट हा खेळ अनिश्चिततेवर जगतो आणि दुर्दैवाने जर पावसाने वानखेडेवर हजेरी लावली व सामना होऊच शकला नाही, तर गणित थेट हिंदुस्थानच्या विरोधात जाऊ शकते. सुपर एटमध्ये विजयाची हॅटट्रिक करणारा इंग्लंड थेट अहमदाबाद गाठणार, असे आयसीसीने आधीच स्पष्ट केले आहे.
पावसाने खेळ बिघडला तर?
सेमीफायनल टाय झाली तर सुपर ओव्हर खेळविली जाते. पण जर पावसामुळे सामना पूर्णच झाला नाही किंवा सुपर ओव्हरही घेता आली नाही तर निर्णय नाणेफेकीने होणार नाही, असाही आयसीसीने नियम केला आहे. अशा विचित्र स्थितीत निकाल ठरवला जाणार तो सुपर-8 फेरीतील कामगिरीवर. त्या टप्प्यात इंग्लंड आपल्या गटात अव्वल ठरला होता, तर हिंदुस्थान दुसऱया क्रमांकावर राहिला. त्यामुळे वानखेडेवरील सामना पावसाने धुऊन गेला, तर इंग्लंडला अंतिम फेरीचे तिकीट मिळेल.



























































