
आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत झालेली प्रचंड वाढ आणि आखातातील युद्धाच्या पार्श्वभूमीवर अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज राज्यसभेत लॉकडाऊनच्या चर्चांवर स्पष्टीकरण दिले. देशात लॉकडाऊनची कोणतीही शक्यता नाही, असे सीतारमण यांनी सांगितले.
गेल्या महिनाभरात कच्च्या तेलाच्या किमती ७० डॉलरवरून थेट १२२ डॉलर प्रति बॅरलपर्यंत पोहोचल्या आहेत. पश्चिम आशियातील तणाव आणि ‘स्ट्रेट ऑफ होर्मुज’मधील अडथळ्यांमुळे ही स्थिती निर्माण झाली आहे. ३० मार्चपर्यंत कच्चे तेल १०० डॉलरच्या खाली येण्याची शक्यता नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
देशातील रिफायनरीज तेल आयात करून प्रक्रिया करत आहेत. जागतिक स्तरावर कच्च्या तेलाची किंमत वाढलेली असली तरी, तेल कंपन्यांनी अधिक खरेदी करावी आणि पुरवठा सुरळीत ठेवावा यासाठी सरकारने आर्थिक भार स्वतःवर घेतल्याचे अर्थमंत्री म्हणाल्या. आंतरराष्ट्रीय अस्थिरता असूनही देशात पेट्रोल-डिझेलच्या किमती स्थिर ठेवण्यात यश आल्याचा दावा त्यांनी केला.



























































