IPL 2025 – ज्याच्यापासून लांब पळाले तेच गळ्यात पडले, पावसाने BCCI ला अहमदाबादमध्येही गाठले

आयपीएलच्या 18 व्या हंगामातील क्वालिफायर 2 सामना सुरू होण्यास पावसामुळे उशीर होत आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी मैदानावर मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्स या संघात होणाऱ्या या ‘करो या मरो’ लढतीकडे क्रीडाप्रेमींचे लक्ष आहे. हा सामना जिंकून फायनलचे तिकीट मिळवण्यासाठी दोन्ही संघ सज्ज असताना अहमदाबादमध्ये पावसाची रिपरिप सुरू झाली. सायंकाळपासून पावसाची रिमझिम सुरू झाल्याने खेळपट्टीवर कव्हर टाकण्यात आले आहे. त्यामुळे सामना सुरू होण्यास उशीर होत आहे. नाणेफेक झाला असून पंजाबने प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले. मात्र पाऊस सुरू झाल्याने अद्याप एकही चेंडू टाकला गेलेला नाही.

प्रतिकूल हवामानामुळे बीसीसीआयने आयपीएलच्या वेळापत्रकामध्ये बदल केला होता. प्ले ऑफच्या लढतींसाठी बीसीसीआयने मुल्लानपूर आणि अहमदाबादची निवड केली होती. क्वालिफायर 1 आणि एलिमिनेटर सामना मुल्लानपूर येथे तर क्वालिफायर 2 आणि अंतिम सामना अहमदाबादचा नरेंद्र मोदी मैदानावर निश्चित करण्यात आला होता. याआधी हे सामने कोलकाता आणि हैदराबाद येथे होणार होते. मुल्लानपूर येथील दोन्ही सामने निर्विघ्न पार पडले, मात्र अहमदाबाद येथील लढतीवर पावसाचे सावट आहे.

सामना रद्द झाल्यास फायनलचे तिकीट कुणाला?

आयपीएलच्या नियमानुसार क्वालिफायर 1, एलिमिनेटर आणि क्वालिफायर 2 या लढतीत पावसाचा व्यत्यय आला आणि 5-5 षटकांचा सामनाही न झाल्यास सुपर ओवर खेळवण्यात येईल. सुपर ओवर न झाल्यास गुणतालिकेतील क्रमवारीनुसार संघ फायनलसाठी पात्र ठरेल. त्यामुळे पंजाब विरुद्ध मुंबई सामना पावसामुळे रद्द झाल्यास मुंबईला मोठा धक्का बसेल आणि पंजाबचा संघ फायनल गाठेल. कारण साखळीत पंजाबचा संघ गुणतालिकेत अव्वल स्थानावर होता.