
जळगाव शहरातील शनिपेठ परिसरातील कांचननगर भागात रविवारी रात्री सुमारे १२ वाजेच्या सुमारास पूर्ववैमनस्यातून दोन गटात वाद झाला. या वादात झालेल्या गोळीबारात एक जण ठार तर दोन जण जखमी झाले असल्याचे वृत्त आहे.
दरम्यान, जखमींवर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे जळगाव शहरात खळबळ उडाली असून पोलीस संशयित आरोपींचा शोध घेत आहेत.
काही दिवसांपासून गुन्हेगारांनी शहरात दहशत माजवली आहे. एमआयडीसी परिसरातील गोळीबाराची घटना ताजी असताना आता शहरातील कांचननगर भागात दोन गटांमध्ये पूर्ववैमनस्यातून वाद निर्माण झाला. वाद चिघळत जाऊन त्याचे रूपांतर थेट गोळीबारात झाले.
गोळीबारात आकाश युवराज बाविस्कर (वय २८) याचा मृत्यू झाल्याची माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली आहे. तर गणेश रविंद्र सोनवणे (वय २६) व तुषार सबसिंग सोनवणे (वय २६) असे दोघे जखमी झाले आहेत. घटनास्थळावर तात्काळ स्थानिक नागरिकांची गर्दी झाली होती.
घटनेची माहिती मिळताच शनिपेठ पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. प्राथमिक चौकशीत गोळीबार करणाऱ्यांमध्ये दोन जणांची नावे समोर येत असून अधिकृत माहिती पोलीसांकडून अद्याप समोर आलेली नाही. तर एलसीबीची टीम देखील गुन्हेगाराच्या शोधार्थ रवाना झाली आहे.
हा गोळीबार हा लाडू गँगकडून झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.






























































