
>> भगवान खैरनार
पालघर आणि ठाणे जिल्ह्यात मोठा गाजावाजा करून सरकारने 1 कोटी बांबू लागवडीचा महत्त्वाकांक्षी कार्यक्रम हाती घेतला आहे. मात्र जव्हार, मोखाडा तालुक्यातील अटल बांबू समृद्धी योजनेतील अनेक शेतकऱ्यांना मागील दोन वर्षांपासून अनुदानाची फुटकी कवडीही देण्यात आली नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे पैसे मिळतील या आशेने अनेकांनी कर्ज, उसनवारी करून आपल्या जमिनीत बांबूची लागवड केली होती. मात्र सरकारनेच आश्वासनाच्या नावाखाली बांबू लावल्याने या दोन्ही तालुक्यांतील शेतकरी आर्थिक संकटात आले आहेत.
जव्हार, मोखाडा तालुक्यात प्रति शेतकरी 1200 रोपं लावण्यात आलेली आहेत. प्रथम वर्षासाठी 90 रुपये द्वितीय वर्षासाठी 50 रुपये तृतीय वर्षासाठी 35 रुपये असे मिळून एका रोपा पाठीमागे साधारण 350 रुपये अनुदान स्वरूपात दिले जाते. अटल बांबू समृद्धी योजनेतून 2024 मध्ये मोखाडा तालुक्यातील 131 तर जव्हार तालुक्यातील 21 अशा एकूण 152 शेतकऱ्यांनी या योजनेतून लागवड केली आहे. ऑगस्ट 2024 मध्ये लागवड झाल्यानंतर फेब्रुवारी 2025 मध्ये या 152 शेतकऱ्यांच्या बांबू लागवडीचे मूल्यमापन करण्यात आले. परंतु लागवड अथवा देखभालीचा एक छदामही देण्यात आलेला नाही.
सरकारला सुनावले खडेबोल
यंदाच्या अर्थ संकल्पात बांबू आधारित उद्योगाच्या निर्मितीसाठी 4 हजार तीनशे कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून 4 हजार चारशे हेक्टर क्षेत्रावर बांबू लागवड करण्याचे उद्दिष्ट आहे. यामध्ये संकल्पित बांबू मिशन योजनेंतर्गत हेक्टरी सात लाख चार हजार रुपये तर अटल बांबू समृद्धी योजनेतील लाभार्थ्यांना केवळ चार लाख वीस हजार रुपये इतके अनुदान दिले जात आहे. त्यामुळे दोन योजनेत तब्बल दोन लाख चौऱ्यांशी हजार रुपयांची तफावत ठेवल्याने ही सापत्न वागणूक थांबवा, असे खडेबोल शेतकऱ्यांनी सरकारला सुनावले आहेत.