
गेल्या दोन दिवसांपासून कोल्हापूर जिल्ह्यात पुन्हा एकदा जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे.धरण क्षेत्रातील अतिवृष्टीमुळे नद्यांच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे. गेल्या चोवीस तासांत पंचगंगा नदी पाणीपातळीत तब्बल पाच फूट वाढ झाली असून, राजाराम बंधाऱ्यावरील पाणी पातळी 29 फुटांवर पोहोचली आहे. यामुळे सकाळी प्रथमच पंचगंगा नदी पात्रा बाहेर पडली असुन,पात्रातील सर्व मंदिरे पाण्याखाली गेली आहेत.दुपारपर्यंत 29बंधारे पाण्याखाली गेले होते.
गेल्या चोवीस तासात पंचगंगा नदी पाणीपातळीत तब्बल पाच फूट वाढ झाली आहे. सकाळी पंचगंगा नदी पात्राबाहेर गेल्याने तेथील मंदिरे पाण्याखाली गेली आहेत. pic.twitter.com/LBul2Bot27
— Saamana Online (@SaamanaOnline) June 24, 2025
दरम्यान राधानगरी तालुक्यातील पाटपन्हाळा या गावात दरड कोसळल्याची तर शिरोळ तालुक्यातील केनवाड गावात कृष्णा नदी काठची अकरा एकरहुन अधिक शेतजमीन वाहून गेल्याची घटना समोर आली आहे.
राधानगरी धरणाच्या विद्युतगृहातून अजुनही 3 हजार 100 क्युसेक पाण्याचा विसर्ग भोगावती नदीपत्रात सुरू आहे.त्यामुळे पंचगंगा नदी पाणी पातळीत वाढ होताना दिसत आहे.राधानगरी धरण क्षेत्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे धरण 63 टक्के भरले आहे.गगनबावडा तालुक्यातील अकनूर आणि कोगेसह अनेक लघु पाटबंधारे प्रकल्प शंभर टक्के भरली आहेत.त्यामुळे इतरही नद्यांच्या पाणी पातळीत कमालीची वाढ होत आहे.
दोन दिवसांपूर्वी पंचगंगेच्या पातळीत पाच फुटांची घट झाली होती.आता पुन्हा वाढ होत असुन,काल सकाळी 8 च्या सुमारास 24 फुट 8 इंच असलेली पाणीपातळी आज दुपारी तीनच्या सुमारास 30 फुट 3 इंच झाली होती.
पंचगंगा नदीची इशारा पातळी 39फूट तर धोका पातळी 43 फूट आहे.धरण पाणलोट क्षेत्रात पावसाची धुवाधार सुरुच राहिल्याने,नद्यांच्या पाणीपातळीत वाढ होताना दिसत होती.
दरम्यान पंचगंगा नदीवरील शिंगणापूर, सुर्वे, राजापूर, रुई, इचलकरंजी तेरवाड, शिरोळ बंधारे पाण्याखाली गेली आहेत.तर कुंभी नदीवरील सांगशी,कासारी नदीवरील ठाणे,आळवे,यवलुज,भोगावती नदीवरील हळदी,राशिवडे, शिरगाव,कोगे तसेच दुधगंगा नदीवरील दत्तवाड यासह जिल्ह्यातील 29बंधारे पाण्याखाली गेले होते.त्यामुळे या मार्गावरील वाहतूक पुर्णपणे बंद झाले असून,पर्यायी मार्गाने वाहतूक वळविण्यात आली आहेत.
सकाळी सातच्या आकडेवारीनुसार
कर्नाटकातील अलमट्टी धरणात कृष्णा आणि पंचगंगा नदीतील 83 हजार 426 क्युसेक पाणी जमा होत होते.तर अलमट्टीतून 70 हजार क्युसेक विसर्ग सुरू होता.तसेच हिप्परगी धरणात 77 हजार 451 क्युसेक पाणी जमा होत होते.तर हिप्फरगीमधुन 76 हजार 401 क्युसेक विसर्ग सुरू होता.