कोकण रेल्वे धो-धो पावसातही अखंडित धावणार, नैसर्गिक आव्हानांना तोंड देण्यासाठी ‘ब्ल्यू प्रिंट’ तयार

कोकण रेल्वेने यंदाच्या पावसाळय़ात प्रवासी सुरक्षा, दक्षता आणि चांगल्या सेवेचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून ‘ब्ल्यू प्रिंट’ तयार केली आहे. याअंतर्गत पावसाळय़ातील नैसर्गिक अडथळे, आव्हानांना तोंड देण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात आल्या आहेत. त्यामुळे कोकण रेल्वे धो-धो पाऊस पडत असतानाही अखंडित धावेल, असा दावा कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक संतोषकुमार झा यांनी मंगळवारी केला.

नवी मुंबईतील बेलापूर भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत संतोषकुमार झा यांनी पावसाळय़ाच्या पार्श्वभूमीवर कोकण रेल्वेच्या तयारीची माहिती दिली. कोकण रेल्वेला प्रतिकूल भौगोलिक परिस्थितीमुळे पावसाळय़ात अडथळय़ांना तोंड द्यावे लागते. याचा विचार करून कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडने विशेष ब्लू प्रिंट तयार केली असून त्यात प्रवासी सुरक्षा, दक्षता आणि चांगल्या सेवेवर भर देण्यात आला आहे. प्रवाशांना त्यांच्या इच्छित ठिकाणी सुरक्षितरीत्या पोहोचवण्याचे कोकण रेल्वेचे उद्दिष्ट असल्याचे झा यांनी यावेळी सांगितले.

पुलांवरील वाऱ्याचा वेग अचूक मोजणार

कोकण रेल्वेमार्गाच्या चार पुलांवरील वाऱ्याचा वेग अचूकपणे मोजण्यासाठी ऑनिमोमीटर्स बसवले आहेत. वाऱ्याचा वेग धोक्याच्या पातळीवर पोहोचल्यास रेल्वे प्रशासन तत्काळ सेवा थांबवण्याचा निर्णय घेऊ शकणार आहे.

लवकरच रोरो सेवा सुरू करणार

कोकण रेल्वेवर लवकरच रो-रो सेवा सुरू करण्यात येणार आहे. चाकरमान्यांना आपल्या गाडय़ा रेल्वेतून गावी नेता येणार आहे. दरम्यान, अपघात रोखण्यासाठी आधुनिक संपर्क प्रणाली तैनात केली आहे.

सुखकर आणि सुरक्षित प्रवासासाठी उपाययोजना

n पावसाळय़ात कोकण रेल्वे मार्गावरील अतिसंवेदनशील भागांत 365 प्रशिक्षित कर्मचारी दिवस-रात्र तैनात असतील. n आपत्कालीन परिस्थितीत मदतीसाठी रत्नागिरी, चिपळूण, कणकवली आणि वेरणा येथे खोदकामासाठी लागणारी यंत्रसामग्री सज्ज असेल. n वीर, चिपळूण, रत्नागिरी, राजापूर रोड, कणकवली, कुडाळ, करमाळी, कारवार आणि उडपी आदी प्रमुख नऊ स्थानकांत ‘रेल्वे देखभाल वाहने’ तैनात असतील. n बेलापूर, रत्नागिरी व मडगाव येथे 24 तास नियंत्रण कक्ष कार्यान्वित केले आहेत. चिपळूण, रत्नागिरी, वेरणा, मडगाव, कारवार व उडपी येथे वैद्यकीय पथके सज्ज.

कोकण रेल्वेवर विशेष यंत्रणा तत्पर ठेवून दरडी कोसळण्याच्या घटनांपासून सावधगिरी बाळगली जात आहे.