भाजप सरकारचं पितळ उघड, कुंभमेळ्यातील चेंगराचेंगरीतील मृतांचा खरा आकडा आला समोर; जाणून धक्काच बसेल

प्रयागराज येथील कुंभमेळ्यात 29 जानेवारी रोजी मौनी अमावस्येला झालेल्या चेंगराचेंगरीत उत्तर प्रदेश सरकारने 37 जणांचा मृत्यू झाल्याचे जाहीर केले होते. मात्र हा दावा खोटा असल्याचं समोर आलं आहे. ‘बीबीसी’च्या पडताळणीत किमान 82 जणांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. या दुर्घटनेत मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबीयांना सरकारने 25 लाख रुपयांची नुकसानभरपाई दिली. परंतु 26 असे कुटुंब आहेत, ज्यांना प्रत्येकी फक्त 5 लाख रुपये रोख दिले गेले. मात्र त्याच्या कुटुंबातील व्यक्तींची नोंद मृतांच्या यादीत करण्यात आली नाही, असं बीबीसीने आपल्या वृत्तात सांगितलं आहे.

प्रयागराजमध्ये कुंभमेळा 13 जानेवारी ते 26 फेब्रुवारीदरम्यान 4 हजार हेक्टर क्षेत्रात आयोजित झाला होता. सरकारने या आयोजनासाठी 7 हजार कोटी रुपये खर्च केले आणि 66 कोटी भाविकांनी हजेरी लावल्याचा दावा सरकारने केला. चेंगराचेंगरीच्या घटनेची माहिती देताना मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी विधानसभेत सांगितले होते की, 29 जानेवारीच्या रात्री 1:10 ते 1:30 दरम्यान संगम नोज येथे ही दुर्घटना घडली. यात 66 भाविक अडकले, त्यापैकी 30 जणांचा मृत्यू झाला. यातील 29 जणांची ओळख पटली.

मात्र बीबीसीच्या पडताळणीत 50 हून अधिक जिल्ह्यांतील 100 पेक्षा जास्त कुटुंबांनी आपल्या नातेवाइकांचा मृत्यू चेंगराचेंगरीत झाल्याचे सांगितले. किमान चार ठिकाणी जीवघेणी चेंगराचेंगरी झाल्याचे पुरावे मिळाले असल्याचं बीबीसीने आपल्या वृत्तात म्हटलं आहे. दरम्यान, उत्तर प्रदेश सरकारने अद्याप मृतांची अधिकृत यादी जाहीर केलेली नाही.