
शेतजमिनीची मोजणी सुरु असताना दोन गटातील वाद विकोपाला गेल्याने हाणामारी झाली. अहमदपूर तालुक्यातील शिरूर ताजबंद येथे ही घटना घडली. याप्रकरणी दोन गटातील एकूण दहा जणांविरोधात अहमदपूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
अहमदपूर तालुक्यातील शिरूर ताजबंद येथील शेतकरी गजानन बालाजी दमकोंडवार आणि गोविंद रामकिशन गुरमे यांच्यात गेल्या अनेक वर्षांपासून शेतजमिनीचा वाद होता. हा वाद मिटवण्यासाठी शेतजमीन मोजून सीमा निश्चित करण्यासाठी भूमी अभिलेख अधिकारी आले होते. यावेळी दोन्ही गटात जमिनीच्या हद्दीवरून वाद झाला. हा वाद विकोपाला जाऊन दोन्ही गटांनी एकमेकांना दगड आणि काठीने बेदम मारहाण केली.
यानंतर दोन्ही गटाकडून अहमदपूर पोलीस ठाण्यात परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक स्मिता जाधव करीत आहेत. गोविंद रामकिशन गुरमे, दत्ता रामकिशन गुरमे, शुभम गोविंद गुरमे, शिवचंद्र गुरमे, उमाकांत रघुवीर गुरमे, विठ्ठल शिवचंद्र गुरमे, बालाजी दमकोंडवार, गजानन बालाजी दमकोंडवार, दयानंद बालाजी दमकोंडवार अशी गुन्हा दाखल केलेल्या आरोपींची नावे आहेत.