कोल्हारमध्ये जेरबंद झालेला बिबट्या पिंजरा तोडून पसार; परिसरात दहशतीचे वातावरण

कोल्हार येथील निबेवस्तीनजीक एकाच ठिकाणी पाचवा बिबट्या जेरबंद झाल्याची घटना घडली. मात्र, शुक्रवारी रात्री पिंजऱ्यात अडकलेला बिबट्या रात्रीत अवघ्या काही तासांत पिंजरा तोडून पसार झाल्याने खळबळ उडाली आहे. नगर-शिर्डी रस्त्यावरील कोल्हारजवळील निबेवस्तीनजीक ‘जलजीवन मिशन’ अंतर्गत साठवण तलावाचे काम सुरू आहे. याच ठिकाणी गत दीड महिन्यात एकाच ठिकाणी वन विभागाने लावलेल्या पिंजऱ्यात एकापाठोपाठ सलग पाचवा बिबट्या जेरबंद झाल्याची घटना समोर आली. बहुधा राज्यातील ही पहिलीच घटना असावी.

शुक्रवारी रात्री साडेआठच्या सुमारास पाचवा बिबट्या जेरबंद झाला. त्याच्या डरकाळ्यांनी परिसरातील नागरिक पिंजऱ्याकडे धावले. पिंजऱ्यात बिबट्याला पाहून त्यांनी सुटकेचा निःश्वास सोडला. मात्र, परिसरातील नागरिक व शेतकऱ्यांचा हा आनंद बिबट्याने एका रात्रीत हिरावून घेत येथील नागरिकांच्या तोंडचे पाणी पळविले. बिबट्याने काही तासांत पिंजऱ्याच्या खालील भागात लावलेले प्लायवूड उखडत पिंजऱ्यातून धूम ठोकली. बिबट्या पिंजरा तोडून पळाल्याने नागरिकांत घबराट पसरली आहे.

सततच्या पावसाने प्लायवूड फुगले; वन विभागाचा दावा
सलग झालेल्या पावसाने पिंजऱ्याच्या खालील भागात लावलेले प्लायवूड फुगले आणि कमकुवत झाले. मुख्यत्वे बिबट्या हा मांजरासारखा प्राणी असल्याने त्याचे शरीरही आकुंचन पावते. त्यामुळे थोड्याशा जागेतूनही तो आपली सुटका करू शकतो. या घटनेतही पिंजऱ्याचे प्लायवूड पावसाने खराब झाले. बिबट्या शक्तिवान प्राणी असल्याने पायाखालील प्लायवूड तोडून त्याने पलायन केले असावे, असा दावा वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी केला आहे.

कोल्हार… बिबट्यांचे नंदनवन !
कोल्हारमध्येच अवघ्या काही दिवसांपूर्वी दोन बिबट्यांच्या झुंजीत एकाचा मृत्यू झाल्याची घटना राजुरी रोडलगत घडली. त्यामुळे कोल्हार-भगवतीपूर गाव बिबट्याच्या सुरक्षित आश्रयाचे नंदनवन ठरते की काय? असा प्रश्न उपस्थित होत असून, बिबट्याच्या दहशतीने बळीराजा धास्तावला आहे.