मुंब्र्यातील 17 बेकायदा इमारतींचे प्रकरण, मुंब्र्यात युपीसारखे ‘माफियाराज’; भूमाफियांकडून तक्रारदारांना धमक्या

खान कंपाऊंडमधील ‘त्या’ 17 बेकायदा इमारती प्रकरणाची न्यायालयीन चौकशी सुरू असतानाच स्थानिक गुंड, भूमाफिया आणि बिल्डरांकडून मूळ जागामालक, तक्रारदार आणि वकिलांना धमकावले जात असल्याचे समोर आले आहे. धमक्यांचे सत्र सुरू झाल्याने उत्तर प्रदेशच्या धर्तीवर मुंब्र्यातदेखील ‘माफियाराज’ वाढत असल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. याबाबत तक्रारदार आणि वकिलांनी थेट गृहविभाग, ठाणे पोलिसांकडे अर्ज करून पोलीस संरक्षणाची मागणी केली आहे.
ठाण्यात कायद्याचे राज्य दिसत नाही. 17 बेकायदा इमारतीच्या बांधकामात ‘अंडरवर्ल्ड’शी संबंध असल्याचे गंभीर निरीक्षण सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी केले होते. शिळफाटा येथील खान कंपाऊंड परिसरात जमीन बळकावून उभारलेल्या बेकायदा इमारतींवर ठाणे पालिका प्रशासनाने हातोडा मारण्यास सुरुवात केली. उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर दस्तुरखुद्द ठाणे पालिका आयुक्त सौरभ राव आणि न्यायालय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत ही कारवाई सुरू झाली असून आतापर्यंत 17 पैकी 13 इमारती जमीनदोस्त करण्यात आल्याचा दावा प्रशासनाने केला आहे.

हातोडा पडल्याने सैरभैर
ठाणे सत्र न्यायालयाचे न्यायाधीश जी. जी. भन्साळी यांच्यामार्फत न्यायालयीन चौकशी सुरू आहे. चौकशीचा आज दुसरा दिवस होता. त्यातच महापालिकेची कारवाईदेखील सुरूच आहे. दरम्यान, बेकायदा इमारतींवर हातोडा पडल्याने सैरभैर झालेल्या स्थानिक भूमाफिया, गुंड आणि बिल्डरांकडून तक्रारदार, वकिलांना धमक्यांचे सत्र सुरू झाले आहे. आज ठाणे न्यायालयात बिल्डर तसेच मूळ जमीनमालक यांच्या साक्षी घेण्यात आल्या.

आरोपींनी जामीन अर्ज मागे घेतला
बेकायदा बांधकामप्रकरणी डायघर पोलीस ठाण्यात एकूण 12 आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापैकी तीन बिल्डरांसह जागेची फेरफार करून फसवणूक करणाऱ्या पाच आरोपींनी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. मात्र त्यांनी आपला जामीन अर्ज मागे घेतला. दरम्यान, एकाही आरोपीला अटक करण्यात आली नसल्याने पोलिसांच्या भूमिकेवर संशय व्यक्त करण्यात येत आहे.