बेळगावमध्ये कन्नड सक्तीविरोधात महाराष्ट्र एकीकरण समिती आक्रमक; कन्नड सक्ती कायद्याला कडाडून विरोध

व्यापारी आस्थापना, दुकानांवर कन्नड भाषेतील फलक लावण्याच्या सक्तीविरोधात महाराष्ट्र एकीकरण समिती प्रचंड आक्रमक झाली आहे. या कन्नड सक्ती कायद्याला तीव्र विरोध करण्याचा इशारा समितीने दिला आहे. त्यामुळे बेळगावमध्ये पुन्हा एकदा मराठी-कन्नड वाद पेटण्याची चिन्हे आहेत.

फलकाच्या कन्नड सक्तीला विरोध करण्याचा इशारा देणारे निवेदन महाराष्ट्र एकीकरण समितीने जिल्हाधिकाऱयांना दिले. या वेळी बेळगाव, कारवार, निपाणी, बिदर, भलकीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे, नही चलेगी नही चलेगी कन्नड सक्ती नही चलेगी, बेळगाव आमच्या हक्काचे नाही कोणाच्या बापाचे अशी जोरदार घोषणाबाजीही निवेदन देताना जमलेल्या कार्यकर्त्यांनी केली. कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी व्यापारी आस्थापनांवरील फलकावर साठ टक्के जागेत कन्नड लिहायलाच हवे असा कायदा करण्यात येईल, अशी घोषणा केली. 28 जानेवारीपूर्वी व्यापारी आस्थापना, दुकानांवर नवीन नियमाप्रमाणे फलक लावण्याचा आदेशही दिला आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र एकीकरण समिती प्रचंड आक्रमक झाली आहे.

मराठी भाषिकांवर अन्याय
कन्नड सक्ती करणे चुकीचे असून हा मराठी भाषिकांवर अन्याय असल्याचे महाराष्ट्र एकीकरण समितीने जिल्हाधिकाऱयांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. कन्नड संघटनांचे कार्यकर्ते मुख्यमंत्र्यांच्या विधानाचा आधार घेऊन मराठी भाषेतील फलक हटवण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे मराठी आणि कन्नड भाषिकांमधील सौहार्दपूर्ण वातावरण बिघडण्याची शक्यता असल्याचेही महाराष्ट्र एकीकरण समितीने म्हटले आहे.