तरुणांचे भविष्य चोरी करणे ही मोदी सरकारची सवय, मल्लिकार्जुन खरगे यांची टीका

काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी केंद्रातील मोदी सरकारवर जोरदार टीका केली आहे. त्यांनी म्हटले की, “देशातील तरुणांचे भविष्य चोरी करणे ही मोदी सरकारची सवय बनली आहे.” दिल्लीतील रामलीला मैदानात एसएससी परीक्षांमधील गैरव्यवहारांच्या विरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर पोलिसांनी केलेला लाठीमार निंदनीय असल्याचे खरगे यांनी म्हटले आहे. ते म्हणाले, “मोदी सरकारच्या कठपुतली पोलिसांनी विद्यार्थ्यांवर केलेली ही क्रूर कारवाई अक्षम्य आहे.” X वर एक पोस्ट करत ते असं म्हणाले आहेत.

खरगे यांनी आरोप केला की, गेल्या 11 वर्षांत भाजपने भर्ती परीक्षांपासून नोकरी मिळेपर्यंतचा तरुणांचा प्रवास पेपर लीक माफियांच्या हवाली केला आहे. तसेच, भाजप-आरएसएसने देशातील शिक्षण व्यवस्था उद्ध्वस्त केल्याचा दावा त्यांनी केला. “देशातील तरुण संतप्त आहेत आणि आता ते हा अन्याय सहन करणार नाहीत,” असे खरगे यांनी ठणकावून सांगितले.