ऑक्टोबरपर्यंत मुंबई-गोवा ‘वंदे भारत’च्या शेकडो फेऱ्या रद्द, मान्सून वेळापत्रकाचा पर्यटकांना फटका

पावसाचा आनंद लुटण्यासाठी ‘वंदे भारत’ एक्सप्रेसमधून कोकणात जाण्याचा प्लान आखणाऱ्या प्रवाशांचा रेल्वेच्या मान्सून वेळापत्रकाने हिरमोड केला आहे. कोकण रेल्वे मार्गावर लागू केलेल्या मान्सून वेळापत्रकामुळे मुंबई-गोवा वंदे भारत एक्स्प्रेसच्या शेकडो फेऱ्या रद्द होणार आहेत. ऑक्टोबरपर्यंत मान्सून वेळापत्रक लागू राहणार असल्याने ‘वंदे भारत’मधून कोकण प्रवासाचे स्वप्न पाहणाऱ्या पर्यटकांची निराशा झाली आहे.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसहून मडगाव स्थानकापर्यंत दररोज धावणाऱ्या ‘वंदे भारत’ एक्स्प्रेसला प्रवाशांचा वाढता प्रतिसाद लाभत आहे. प्रवासी तिकीट बुकिंग करताना ‘वंदे भारत’ला प्राधान्य देतात. मात्र पावसाळ्यात कोकण रेल्वेचा प्रवास करू पाहणाऱ्या प्रवाशांना मान्सून वेळापत्रकामुळे ‘वंदे भारत’ एक्सप्रेसमधून प्रवास ‘मिस’ करावा लागणार आहे. कोकण रेल्वे मार्गावर 20 ऑक्टोबरपर्यंत मान्सून वेळापत्रक लागू राहणार असून या अवधीत अप आणि डाऊन मार्गावरील ‘वंदे भारत’ एक्सप्रेसच्या शेकडो फेऱ्या रद्द करण्यात येणार आहेत. मान्सून वेळापत्रकानुसार ऑक्टोबर महिन्यापर्यंत सीएसएमटी ते मडगावदरम्यान धावणारी ‘वंदे भारत’ एक्सप्रेस आता आठवड्यात तीन दिवस चालवली जाणार आहे.