
कर्णधार सिद्धेश लाडच्या नाबाद अर्धशतकाच्या जोरावर आणि वेगवान गोलंदाज रोहन राजेच्या पाच विकेट्सच्या जबरदस्त खेळीमुळे मुंबई साऊथ सेंट्रल मराठा रॉयल्सने ईगल ठाणे स्ट्रायकर्सवर 8 विकेट्सनी मात करत टी-20 मुंबई लीगच्या अंतिम फेरीत सर्वप्रथम धडक मारली तर इशान मुलचंदानीच्या तडाखेबंद 52 धावांच्या खेळीने मुंबई फाल्कन्सला वांद्रे ब्लास्टर्सविरुद्ध 5 विकेट राखून दणदणीत विजय मिळवून दिला. आता येत्या गुरुवारी फाल्कन्स मराठा रॉयल्सविरुद्ध मुंबई लीगच्या जेतेपदासाठी भिडतील.
दुसऱ्या उपांत्य सामन्यात वांद्रे ब्लास्टर्सला 20 षटकांत 130 धावांत रोखण्याची किमया मुंबई फाल्कन्सच्या गोलंदाजांनी केली. तेथेच फाल्कन्सने आपली अर्धी लढाई जिंकली होती. त्यानंतर अंगक्रिष रघुवंशीने संघाला 30 धावांची खणखणीत सलामी दिली. यात अंगक्रिषचा वाटा 27 धावांचा होता. त्याने 14 चेंडूंच्या खेळात 3 षटकार आणि 1 चौकार ठोकला. तो बाद झाल्यावर इशान मुलचंदानी आणि अमोघ भटकळने 37 धावांची भागी रचली. पण ही जोडी फुटताच फाल्कन्सला 11 धावांत 3 धक्के बसले. कर्णधार श्रेयस अय्यर अवघ्या एका धावेवर बाद झाला. 4 बाद 78 या अवस्थेमुळे फाल्कन्स विजयाच्या शर्यतीत मागे पडल्यासारखे वाटत होते. पण मुलचंदानीने आकाश पारकरच्या साथीने अफलातून खेळ करत 62 धावांची विजयी भागी रचत संघाचा अंतिम फेरी प्रवेश निश्चित केला. फाल्कन्सने 32 चेंडू आधीच विजयावर शिक्कामोर्तब केले.
त्याआधी कर्णधार आकाश आनंद (31) आणि ध्रुमिल मटकर (34) यांच्या उपयुक्त फलंदाजीमुळे ब्लास्टर्स शंभरीपलीकडे पोहोचला होता. सिद्धार्थ राऊत आणि आकाश पारकर यांनी केलेल्या प्रभावी गोलंदाजीमुळे ब्लास्टर्सची धावसंख्या 130 च्या पुढे पोहोचू शकली नाही.
तत्पूर्वी, ठाणे स्ट्रायकर्स आणि मराठा रॉयल्स यांच्यात झालेल्या उपांत्य सामन्यात सिद्धेश लाडच्या 74 धावांच्या नाबाद खेळीने संघाला सहज अंतिम फेरी गाठून दिली. रॉयल्सने 132 धावांचे लक्ष्य 17.5 षटकांतच गाठले. रॉयल्सच्या रोहन राजेने 40 धावांत अर्धा संघ गारद केल्यामुळे त्यांना ठाणे स्ट्रायकर्सला 8 बाद 131 धावांवर रोखता आले. ठाणे स्ट्रायकर्सकडून साईराज पाटील (41) आणि अथर्व अंकोलेकरने (34) पाचव्या विकेटसाठी 43 धावांची भागी केली. त्यामुळे त्यांचा संघ शंभरच्या पुढे पोहोचू शकला.