
नॅशनल इन्स्टिटय़ुट ऑफ डिझाइनच्या (एनआयडी) विद्यार्थ्यांनी साकारलेली विशेष सोळा स्मृतीचिन्हे भारताचे अंतराळवीर ग्रुप पॅप्टन शुभांशू शुक्ला यांच्यासोबत थेट अंतराळातील अवकाश स्थानकात झेपावली होती. यापैकी दहा स्मृतिचिन्हे महाराष्ट्रातील चौदा विद्यार्थ्यांनी साकारलेली होती.
हिंदुस्थानच्या सांस्कृतिक वारशाचे प्रतिनिधित्व करणारी ही स्मृतिचिन्हे अवकाश प्रवासात सहभागी करणे, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता. इस्रोच्या ‘ह्युमन स्पेस फ्लाइट सेंटर’ (एचएसएफसी)कडून एनआडीच्या विद्यार्थ्यांना लघू अवकाशीय स्मृतिचिन्हे तयार करण्यासाठी आमंत्रित करण्यात आले होते. त्यासाठी काही अटी ठेवण्यात आल्या होत्या. स्मृतिचिन्हे तयार करताना केवळ लाकूड, धातू किंवा वस्त्र एवढेच साहित्य वापरण्याची मुभा होती. वस्तूंचे आकारमान व वजन हे निश्चित करण्यात आले होते. तसेच चित्र असल्यास ते दहा सेमी बाय दहा सेमी एवढय़ाच आकारात काढायचे होते.
‘ह्युमन स्पेस फ्लाइट सेंटर’च्या आवाहनाला प्रचंड प्रतिसाद लाभला. एनआयडीच्या विविध शाखांमधून अडीचशेहून अधिक प्रवेशिका आल्या. पहिल्या फेरीत 22 प्रवेशिकांची निवड करण्यात आली. शेवटी 16 स्मृतीचिन्हे अवकाशात झेपावली. आता ही स्मृतिचिन्हे इस्रोच्या संग्रहालयात ठेवण्यात येणार आहेत.
या विद्यार्थ्यांचा बहुमान
शुभम वराडे व अर्णव कारेकर– चतुरथ आणि विश्वरूपम्, ऋषब शर्मा– इकोज ऑफ ट्रेडिशन, पृथु चित्रे व सानिका जोशी– युनायटेड पीपल ऑफ भारत, लाईफ ऑफ भारत आणि रिफ्लेक्शन ऑफ भारत, नम्रता मेर– स्टॅम्प्स ऑफ इंडिया, वेद पाटील व ध्वनी जैन– द्वार, मोहित पाट्रो– फ्लोटिंग थॉट्स, रुचिरा बोरहाडे– इंडियाज अस्पायरिंग व्हिजन, श्रेयस व्यास व सायली सावंत– इंडियन स्पेस ओडिसी, पियुष रैबोले– प्रिझम ऑफ ट्रेडिशन्स आणि नव्यनोव्हा चांडालिया– धरोहर.