मुंबई, ठाण्यासह कोकणात गुरुवारपासून वादळी पाऊस! हवामान खात्याकडून ‘ऑरेंज अलर्ट’ जारी, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

मुंबई, ठाण्यासह शुक्रवार, 12 जूनपासून 17 जूनपर्यंत कोकणात मुसळधार वादळी पाऊस बरसणार आहे. याबाबत हवामान खात्याकडून खबरदारीचा ‘ऑरेंज अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. यामध्ये नदीकाठच्या गावांना विशेष खबरदारी घ्यावी, असे आवाहन हवामान विभागाकडून करण्यात आले आहे.

कोकणात मुसळधार पावसामुळे नद्या धोक्याची पातळी ओलांडून वाहण्याचाही धोका हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. शिवाय नद्यांना पूर येऊन नागरी जीवनही विस्कळीत होऊ शकते, असा इशाराही हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. शिवाय घाटरस्त्यांमध्ये ढगाळ वातावरणामुळे दृश्यमान्यताही कमी होऊ शकते. तसेच मुसळधार पावसामुळे काही ठिकाणी दरड कोसळण्याचाही धोकाही हवामान खात्याकडून देण्यात आला आहे.

ताशी 55 किमी वेगाने वारे वाहणार

दक्षिण कोकण आणि गोव्यामध्ये 13 आणि 14 जून रोजी ताशी 45 ते 55 किमीपर्यंत वेगाने वारे वाहू शकतात. त्यामुळे वादळी पावसापासून सावध रहावे, असेही हवामान खात्याकडून सांगण्यात आले आहे. किनाऱ्यालगतच्या गावांना धोका असल्याचेही हवामान खात्याने स्पष्ट केले आहे.