‘ऑपरेशन सिंदूर’वरून राजकारण सुरूच, पाकिस्तानबद्दल मागील सरकारांचे धोरण मवाळ होते; मोदी सरकारने बदलले

‘ऑपरेशन सिंदूर’वरून मोदी सरकारचे राजकारण सुरूच आहे. पाकिस्तानबद्दल गेल्या सरकारांचे धोरण मवाळ होते, परंतु मोदी सरकारने ते बदलले असे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी म्हटले आहे. तसेच हिंदुस्थानने नेहमीच आपल्या शेजारील देशांशी चांगले संबंध ठेवण्याची अपेक्षा करू नये, असे सांगतानाच हिंदुस्थानने आखलेल्या सुज्ञ धोरणामुळे कोणत्याही देशात सरकार बदलले तरी संबंध चांगलेच राहतात असेही जयशंकर यांनी स्पष्ट केले आहे.

नवी दिल्लीत आयोजित डीडी इंडिया या कार्यक्रमात ते बोलत होते. हिंदुस्थानसोबत एकत्र काम केल्याने त्यांना फायदाच होतो आणि असे केले नाही तर त्यांचे नुकसानच होते, हे शेजारील देशांनी समजून घेतले पाहिजे. काही देशांना हे समजण्यास वेळ लागतो, असेही परराष्ट्र मंत्री म्हणाले. पाकिस्तान त्याला अपवाद आहे. कारण या देशाने कायमच हिंदुस्थानविरोधात शत्रुत्वाची भूमिका घेतली आहे, याकडेही एस. जयशंकर यांनी लक्ष वेधले. दरम्यान, 2016 च्या ‘सर्जिकल स्ट्राईक’, 2019 च्या ‘बालाकोट एअर स्ट्राईक’ आणि ‘ऑपरेशन सिंदूर’बद्दल बोलताना जयशंकर म्हणाले की, आता हिंदुस्थान केवळ प्रत्युत्तर देत नाही, तर गरज पडल्यास पुढाकारही घेतो.

 पूर्वीच्या सरकारांनी सीमांचा विकास केला नाही

पूर्वीच्या सरकारांनी सीमेचा विकास केला नाही, ही एक मोठी चूक होती. आज आपण चीनविरोधात खंबीरपणे उभे आहोत. कारण आपण तेथे आवश्यक पायाभूत सुविधा उभारल्या आहेत, असेही परराष्ट्र मंत्री म्हणाले. गेल्या 11 वर्षांत मोदी सरकारने शेजारील देशांशी हिंदुस्थानचे संबंध मजबूत करण्यावर विशेष भर दिला. श्रीलंकेत सरकार बदलले, परंतु त्यांचे हिंदुस्थानशी संबंध चांगले राहिले. सुरुवातीला मालदीवसोबत काही समस्या होत्या, परंतु आता त्यांच्यासोबत संबंध सुधारले आहेत. नेपाळच्या राजकारणातही हिंदुस्थानला अनेकदा ओढले जाते, परंतु त्याची चिंता आपण करू नये असेही ते म्हणाले.