
27 ऑगस्टपासून सुरू होणारा गणेशोत्सव यंदा महाराष्ट्र आणि हिंदुस्थानसह परदेशातही मोठ्या धुमधडाक्यात आणि भक्तीभावाने साजरा होणार आहे. रायगड जिल्ह्यातील पेणमध्ये असलेल्या विविध कारखान्ऱ्यांमधून आतापर्यंत सात हजार बाप्पा सातासमुद्रापार गेले आहेत. जगाच्या कानाकोपऱ्यातून सुमारे 22 हजार भक्तांनी गणेशोत्सवात प्रतिष्ठापना करण्यासाठी श्रींच्या मूर्तीची मागणी केली आहे. त्यापैकी सात हजार गणेशमूर्ती परदेशात रवाना झाल्या आहेत.
पेणमधील साकारण्यात येणाऱ्या गणरायाच्या मूर्तीना फक्त मुंबई, महाराष्ट्रातूनच नाही तर संपूर्ण जगभरातून मोठी मागणी आहे. त्यामुळे पेणमधील विविध कारखान्यांमध्ये गणेशोत्सवाची तयारी सुरू झाली आहे. विविध आकार, रूपातील मूर्ती पेणच्या कारखान्यांमध्ये साकारले जात आहेत. परदेशातील जवळपास 22 हजार अनिवासी हिंदुस्थानी गणेशभक्तांनी पेणच्या गणपती मूर्ती कारखान्यांमध्ये मूर्तीची मागणी केली आहे. ही मागणी पूर्ण करण्यासाठी विविध कारखान्यांमध्ये सध्या लगबग सुरू आहे.
यंदा 27 ऑगस्ट ते 6 सप्टेंबरदरम्यान गणेशोत्सव पार पडणार आहे. पूर्वी महाराष्ट्रापुरता मर्यादित असलेला हा सण आता देश-विदेशात साजरा करण्यात येऊ लागला आहे. जगाच्या कानाकोपऱ्यात नोकरी आणि व्यवसायानिमित्त स्थायिक झालेले अनिवासी हिंदुस्थानी गणेशोत्सव साजरा करतात. यावर्षी अशा जवळपास 22 हजार गणेशभक्तांनी पेणच्या गणपती मूर्ती कारखानदारांकडे गणपती मूर्तीची मागणी केली आहे. परदेशातून नोंदणी झालेल्या गणपती मूर्तीची मागणी पूर्ण करण्यासाठी कारखानदार अहोरात्र परिश्रम घेत आहेत. मार्च महिन्यापासूनच परदेशी गणेशभक्तांची मागणी पूर्ण करण्यात येणार आहे.
दोन फुटांच्या मूर्तीना अधिक पसंती
परदेशात मागविण्यात आलेल्या मूर्तीपैकी 70 टक्के मूर्तीची उंची दोन फुटांपर्यंत आहे, तर उर्वरित मूर्ती त्याहून अधिक उंचीच्या आहेत. या मूर्तीमध्ये सिंहासनावर विराजमान गणपती मूर्ती, दगडूशेठ हलवाई, बालगणेश या मूर्तीना मागणी आहे. गणपती मूर्तीना कापडी फेटा, कापडी धोतर, शेला यासह डायमंड, इमिटेशन ज्वेलरीने सजविण्यात आले आहे. या मूर्ती परदेशात पाठवण्यासाठी विशेष नियोजन कारखानदारांनी केले आहे.