
श्री विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन घेण्यासाठी लाखो भाविकांनी गर्दी केली होती. चंद्रभागा घाट, वाळवंट, मंदिर परिसर, दर्शनरांग, प्रदक्षिणा मार्ग, भक्तिमार्ग भाविकांनी फुलून गेले. दिवसभर दोन लाखांवर भाविकांनी दर्शनासाठी हजेरी लावली. दर्शनरांग ३ कि.मी.पर्यंत गेली होती. दर्शनरांगेतील भाविकांना मुलभूत सेवासुविधा मंदिर समितीकडून पुरवण्यात येत असल्याने भाविकांमधून समाधान व्यक्त करण्यात आले.
परतीच्या पावसाने राज्यात पूरपरिस्थिती निर्माण केली. सीना, भीमा नदीकाठी शेतीपिकांचे, नागरिकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे ‘विठ्ठला आता नको पाऊस, बस्स कर’, अशी आर्त हाक भाविक देत होते.
पाशांकुशा एकादशीनिमित्त भाविकांनी चंद्रभागा वाळवंट, मंदिर परिसर, दर्शनरांग, प्रदक्षिणा मार्ग, भक्तिमार्ग फुलून गेला आहे. चंद्रभागा नदीपात्रात उजनी व वीर धरणांतून मुबलक पाणी सोडण्यात आल्यामुळे एकादशीला आलेल्या भाविकांनी दिवसभर स्नानाचा आनंद घेतला, तर चंद्रभागेत पाणी जास्त असल्याने स्नान करण्यासाठी जाणाऱ्या भाविकांना विशेष सूचना दिल्या जात आहेत. जास्त पाण्यात जाण्यास भाविकांना मज्जाव करण्यात येत आहे. चंद्रभागा स्नानानंतर पदस्पर्श दर्शन तसेच मुख दर्शन व कळस दर्शन घेण्यास भाविक प्राधान्य देत होते. सकाळी पदस्पर्शदर्शन पत्राशेडच्या जवळ पोहोचली आहे. तसेच प्रदक्षिणा मार्ग, भक्तिमार्ग, स्टेशन रोड भाविकांनी फुलून गेला आहे.
पाशांकुशा एकादशीला आलेल्या भाविकांच्या वाहनांनीदेखील शहरातील वाहनतळ हाऊसफुल्ल झाले आहे. गजानन महाराज मठालगतचे वाहनतळ फुल्ल झाल्याने बहुतांश वाहने रस्त्याच्या बाजूला दुतर्फा लावण्यात आली आहेत. छत्रपती शिवाजी महाराज चौक येथील शिवतीर्थ हे ‘व्हीआयपी’ वाहनांसाठी पार्किंग म्हणून आषाढी यात्रेपासून उपयोगात आणले जात आहे. परंतु, एकादशीदिवशी या पार्किंगच्या ठिकाणावर हातगाडे, स्टॉलधारकांनी दुकाने लावल्याने वाहने पार्किंग करता आली नाहीत. त्यामुळे वाहतूककोंडी सतत होताना दिसून आली. यातच शहातील बहुतांश रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडले आहे. त्यामुळे वाहतूककोंडी होताना दिसत आहे. मात्र, याकडे चौकात थांबलेल्या वाहतूक पोलिसांकडून दुर्लक्ष करण्यात येत आहे.
श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिराचे जतन व संवर्धनाचे काम करण्यात येत आहे. मंदिराचे जुने पुरातन रूप भाविकांना डोळ्यात साठवता येत आहे. श्री विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन झाल्यानंतर नगरप्रदक्षिणा करण्यास भाविकांनी प्राधान्य दिले.
पापाची मुक्ती आणि मोक्षाची प्राप्ती
पाशांकुशा एकादशी केल्याने पापाचा अंत होतो आणि पुण्य लाभते, अशी भावना भाविकांमध्ये आहे. त्यामुळे पंढरपूरला येणे आणि मोक्ष प्राप्त करून घेण्यासाठी भाविक एकादशी करतात, असे भागवत महाराज चवरे यांनी पाशांकुशा एकादशीचे महत्त्व सांगितले.