
ऊन आणि त्यातच अधून मधून कोसळणाऱ्या पावसाच्या धारांमुळे वातावरणात बदल झाला आहे. याबदलत्या वातावरणामुळे साथीच्या आजाराने डोके वर काढले असल्याने खोपोली शहरात मोठ्या प्रमाणावर डासांचे साम्राज्य पसरले आहे. खोपोलीकरांवर डासांनी हल्ला चढवला असून औषध फवारणीकडे पालिकेचे दुर्लक्ष असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
खोपोली शहरातील नाले, गटारातील कचरा साफ करण्यात आलेला नाही. त्यामुळे जागोजागी सांडपाणी साचले आहे. शहरातील सर्वच भागांतील गटारे कचऱ्याने तुडुंब भरल्याने रस्त्यावर घाण साचून मोठ्या प्रमाणावर दुर्गंधी पसरली आहे. तसेच अनेक जुन्या इमारतीच्या शौचालयाच्या टाक्या उघड्या असल्याने दुर्गंधी पसरून डासांचे प्रमाण वाढले आहे. कचराही वेळोवेळी उचलला जात नसल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. पालिकेने जनतेच्या आरोग्याशी न खेळता ताबडतोब शहरात सर्व प्रभागात डास प्रतिबंधात्मक औषधांची फवारणी करावी तसेच शहरातील स्वच्छतेकडे लक्ष द्यावे, अशी मागणी नागरिक करीत आहेत.
आरोग्याशी खेळत असल्याचा संताप
शहरातील नागरिकांना विविध आजारांशी सामना करावा लागत आहे. ताप, थंडी, सर्दी, खोकल्यासारख्या आजारांनी रुग्णालये भरलेली आहेत. पालिकेचे शहरातील आरोग्य यंत्रणेवर नियंत्रण नसल्याने औषधांची फवारणी केली जात नाही. वेळोवेळी पालिकेच्या आरोग्य विभागाकडे तक्रार करूनही नागरिकांच्या तक्रारीकडे जाणून बुजून दुर्लक्ष करून नागरिकांच्या आरोग्याशी खेळत असल्याचा संताप नागरिक व्यक्त करीत आहेत.