रक्तदाबाला दूर ठेवण्यासाठी हेल्दी खा, स्वस्थ राहा, मस्त राहा; पालिकेचे मीठ-साखर जनजागृती अभियान

गेल्या काही वर्षांपासून मुंबईकरांच्या आहारात मीठ आणि साखरेचे प्रमाण वाढल्यामुळे त्यांना रक्तदाबाचा त्रास होत आहे. त्यामुळे मुंबईकरांच्या आहारातील मीठ व साखरेचे प्रमाण कमी करण्याची सवय निर्माण करणे, पदार्थांचे आवरण (फूड लेबल) वाचण्याची सवय लावून सूचित आहार निवडीसाठी प्रवृत्त करणे तसेच प्रक्रियायुक्त अन्नपदार्थांचे मर्यादित सेवन करण्यासाठी मुंबई महापालिकेकडून मीठ-साखर जनजागृती मोहीम राबवली जात आहे. या मोहिमेतून हेल्दी खा, स्वस्थ राहा, मस्त राहा आणि रक्तदाबाला दूर ठेवा, असा संदेश देण्यात येत आहे.

17 मे रोजी असलेल्या जागतिक रक्तदाब दिनानिमित्त पालिकेचे घोषवाक्य ‘रक्तदाब अचूक मोजा, नियंत्रणात ठेवा आणि दीर्घायू व्हा’ हे आहे. उच्च रक्तदाबाला दूर ठेवण्यासाठी रक्तदाबाची तपासणी करावी, नियमित औषधे घ्या, मिठाचे प्रमाण कमी करा, योगा, व्यायाम करावा तसेच आहारात योग्य बदल करावा, असे आवाहन केले आहे.

1 लाखाहून जास्त लोकांना रक्तदाब 

उच्च रक्तदाबामुळे आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतात. रक्तदाबामुळे पक्षाघात, हृदयाचे विकार, किडनीचे आजार, नेत्रविकार होऊ शकतात. मुंबईत 2023 पासून आतापर्यंत घरभेटींद्वारे 30 वर्षांवरील 25 लाख व्यक्तींचे उच्च रक्तदाबासाठी सर्वेक्षण करण्यात आले आहे. त्यापैकी 1 लाख 40 हजार व्यक्तींना उच्च रक्तदाबाचा आजार आहे.

जास्त मीठ खाणे टाळा

जागतिक आरोग्य संघटनेनुसार प्रतिदिन 5 ग्रॅमपेक्षा जास्त मीठ खाल्ल्यास आरोग्य धोक्यात येते. मुंबईमध्ये 2021 मध्ये केलेल्या सर्वेक्षणानुसार, मुंबईकर प्रतिदिन 9 ग्रॅम मिठाचे सेवन करतात. मिठाचे हे प्रमाण जागतिक आरोग्य संघटनेच्या शिफारशीपेक्षा जास्त आहे.

लहान मुलांच्या आहारावर ठेवा लक्ष

विविध देशात केलेल्या संशोधनाद्वारे असे आढळून आले की, लहान वयात मिठाचा वापर कमी केल्याने तरुण वयात उच्च रक्तदाब व हृदयविकार इत्यादी आजार होण्याचा धोका कमी करता येतो. त्यामुळे मुलांच्या आहारावर लक्ष ठेवा, असे आवाहन पालिकेने केले आहे.