
मुंबईत दमदार आगमन करणाऱ्या मान्सूनने मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांकडे पाठ फिरवल्याने मुंबईचा पाणीसाठा 10 टक्क्यांवर आला आहे. कमी होत जाणाऱ्या पाणीसाठय़ाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारच्या भातसा आणि अप्पर वैतरणा तलावांमधून सुमारे 2 लाख 30 हजार 500 दशलक्ष लिटर पाणीसाठा घेण्यास राज्य सरकारने आधीच मंजुरी दिली आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत तलाव क्षेत्रात पावसाने हजेरी लावली नाही तर मुंबई महापालिकेची सर्व मदार राज्य सरकारच्या याच राखीव पाणीसाठय़ावर राहणार आहे. दरम्यान, गेल्या वर्षी पाणीसाठा 10 टक्क्यांवर पोहोचल्यावर पाणीकपात करण्यात आली होती.
मुंबईला मोडक सागर, मध्य वैतरणा, अप्पर वैतरणा, भातसा, तानसा, विहार व तुळशी या सात धरणांतून दररोज 3 हजार 950 दशलक्ष लिटर पाणीपुरवठा होतो. मुंबईची वर्षभराची तहान भागवण्यासाठी सातही धरणांत 14 लाख 47 हजार 363 दशलक्ष लिटर पाण्याची गरज भासते. परंतु यंदा सातही तलावांमध्ये केवळ 1 लाख 45 हजार 713 दशलक्ष लिटर पाणीसाठा म्हणजे केवळ 10.07 इतका पाणीसाठा उरला आहे.
…तर जुलैपर्यंत पाणीसाठा पुरेल
राज्य सरकारने मे महिन्यांत मुंबईला 2 लाख 30 हजार 500 दशलक्ष लिटर राखीव साठा तत्त्वता उपलब्ध करून देण्यास मान्यता दिली आहे. ज्यावेळी पाणीसाठा अगदीच कमी होतो त्यावेळी भातसा आणि अप्पर वैतरणा तलावांमधून हा राखीव पाणीसाठा घेण्यात येतो. हा राखीव साठा घेतला तर मुंबईकरांना जुलै अखेरपर्यंत पाण्याची आवश्यकता भासणार नाही.
10 जून रोजी धरणातील पाणीसाठा (दशलक्ष लिटर)
अप्पर वैतरणा 1,696
मोडक सागर 36,012
तानसा 15,422
मध्य वैतरणा 26,585
भातसा 54,500
विहार 9,123
तुळशी 2,375
दोन–तीन दिवसांत राखीव पाणीसाठय़ाचा वापर करणार
पावसाने विश्रांती घेतल्यामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांतील पाणीसाठा आटला आहे. त्यामुळे येत्या दोन-तीन दिवसांत राखीव पाणीसाठय़ाच्या वापराला सुरुवात केली जाईल, अशी माहिती अतिरिक्त आयुक्त अभिजीत बांगर यांनी दिली.