
मुंबई महापालिकेचा पवई तलाव स्वच्छ आणि सुंदर करण्यासाठी साफसफाई कामाने वेग घेतला असून आतापर्यंत गेल्या 10 दिवसांत मुंबई महापालिकेने तलावातून तब्बल 1 हजार 450 मेट्रिक टन जलपर्णी काढली आहे. यामुळे पवईचे नैसर्गिकरीत्या जतन आणि पुनरुज्जीवन करणे शक्य होणार आहे.
पवई तलाव हा 1891 साली बांधण्यात आला असून त्याचा संपूर्ण जलव्याप्त परिसर 223 हेक्टर इतका आहे. जवळपास 6.6 किलोमीटरचा परिघ असलेल्या पवई तलावाचे पाणलोट क्षेत्र हे सुमारे 600 हेक्टरपर्यंत पसरलेले आहे. तलावाची जलधारणा क्षमता ही सुमारे 5 हजार 455 दशलक्ष लिटर इतकी आहे. पवई तलावाचे पाणी हे पिण्याव्यतिरिक्त इतर कामासाठी वापरले जाते. पवई तलाव परिसरात वाढलेले नागरीकरण आणि तलावामध्ये येणारे सांडपाणी इत्यादी कारणांनी तलावामध्ये जलपर्णीसह इतर अनावश्यक वनस्पतींची वाढ झाली आहे. सूर्यप्रकाशाचे पाण्यातील परावर्तन कमी होऊन तलावातील माशांचे खाद्य असणाऱया वनस्पतींची वाढ खुंटते आणि अन्नसाखळीत अडथळा निर्माण होतो. पाण्याची गुणवत्तादेखील खालावते. हे होऊ नये आणि तलावाचे जतन आणि संर्वधन व्हावे, यासाठी महापालिकने पुढाकार घेतला आहे.
असे सुरू आहे काम
पवई तलावात जलपर्णी काढण्याचे काम अधिक प्रभावी होण्यासाठी 5 संयंत्रांद्वारे काम अधिक वेगाने सुरू करण्यात आले आहे. हार्वेस्टर मशीन, पंटून माउंटेड पोकलेन आणि पोकलेन, डंपर या यंत्रसामग्रीच्या सहाय्याने ही कामे सुरू आहेत. त्यासाठी दोन सत्रांमध्ये अधिकचे मनुष्यबळ वापरले जात आहे. पावसाळ्यानंतर 6 संयंत्रे तैनात करण्यात येणार आहेत. जलपर्णीची मुंबई महानगराबाहेरील क्षेपणभूमीवर विल्हेवाट लावण्यात येत आहे. ‘बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी’ या संस्थेच्या तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली ही कार्यवाही केली जात आहे. दरम्यान, पवई तलावात सोडणारे सांडपाणी रोखण्यासाठी पर्जन्य जलवाहिनी खात्याने दोन निविदा काढल्या आहेत.