
मुंबईची बोलीभाषा हिंदी आहे, ती आमची लाडकी बहीण आहे, असे वक्तव्य करून वादाच्या भोवऱयात सापडलेले ‘एसंशि’ गटाचे मंत्री प्रताप सरनाईक आज पुन्हा बरळले. मराठीचा सन्मान सर्वाधिक मीच केला, मराठीला अभिजात भाषेचा दर्जा माझ्यामुळेच मिळाला, असे ते म्हणाले. त्यावरून पुन्हा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
मीरा-भाईंदरमध्ये शनिवारी झालेल्या हिंदी पत्रकार दिनाच्या कार्यक्रमात प्रताप सरनाईक यांनी वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यांच्या वक्तव्यावरून टीका होऊ लागल्याने आज त्यांनी घुमजाव करण्याचा प्रयत्न केला. पण स्पष्टीकरण देताना त्यांचा पाय आणखी खोलात गेला. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळवून देण्यासाठी मीच सर्वाधिक प्रयत्न केले असा अजब दावा त्यांनी केला.
माझ्या ओवळा-माजिवडा मतदारसंघातील रस्त्यांना साहित्यिक विंदा करंदीकर, पु. ल. देशपांडे यांच्यापासून नामदेव ढसाळ यांच्यापर्यंत साहित्यिकांची नावे मीच दिली आहेत, असेही सरनाईक म्हणाले. शनिवार असल्याने काहीच बातमी नाही म्हणून आपली बातमी प्रसारमाध्यमांनी पेरली, पत्रकारांनी नको त्या बातम्या पेरू नये, असे म्हणत त्यांनी माध्यमांवरही खापर फोडले.