
आर्टिफिशियल इंटेलिजन्स तंत्रज्ञानाच्या जागतिक स्पर्धेत महाराष्ट्राने दिशादर्शक व्हावे यासाठी राज्याचे पहिले एआय (कृत्रिम बुद्धिमत्ता) धोरण तयार करा, असे निर्देश माहिती व तंत्रज्ञान मंत्री आशीष शेलार यांनी सह्याद्री अतिथीगृहावर घेतलेल्या आढावा बैठकीत दिले.
एआय तंत्रज्ञानाचा वापर करून अधिक उद्योग, व्यवसाय उभे राहतील. तरुणांना रोजगार मिळतील व तंत्रज्ञानाच्या जागतिक स्पर्धेत महाराष्ट्र सक्षमपणे स्पर्धा करू शकेल असे त्यांनी सांगितले.
विभागाचा आढावा घेत अधिकाऱयांना पुढील वाटचालीविषयी मार्गदर्शन करताना मंत्री आशीष शेलार म्हणाले, एआय तंत्रज्ञानाचे युग सुरू झाले आहे. महाराष्ट्राने या क्षेत्रात आघाडी घेतली पाहिजे. एआयचा प्रभावी उपयोग करून आपण अधिक उद्योग व व्यवसाय आकर्षित करीत तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देऊ शकतो. जागतिक स्पर्धेत महाराष्ट्राचे स्थान भक्कम करण्याची ही संधी आहे.
माहिती तंत्रज्ञान विभागाच्या या बैठकीस आयटी विभागाचे सचिव पराग जैन नैनुटिया, महाआयटीच्या व्यवस्थापकीय संचालक जयश्री भोज आणि संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.