Manipur Violence : हिंसाचार, बलात्कार आणि अशांतता, पंतप्रधानांनी मणिपूरला वाऱ्यावर सोडलं आहे का? प्रियांका गांधींची टीका

मणिपुरमध्ये पुन्हा एकदा हिंसाचाराच्या घटना घडत असून येथे तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली आहे. याच पार्श्वभूमीवर काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारवर टीका केली आहे. मणिपुरमधील सततच्या हिंसाचारामुळे सुमारे दोन वर्षांपासून जनता हत्या, बलात्कार, स्थलांतर आणि अशांततेला सामोरी जात आहे. या परिस्थितीत केंद्र सरकारच्या निष्क्रियतेवर प्रियांका गांधींनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत.

प्रियांका गांधी यांनी X वर एक पोस्ट करत मणिपुरमधील परिस्थितीवर भाष्य करताना म्हटलं आहे की,, “मणिपूर पुन्हा एकदा हिंसाचाराच्या विळख्यात सापडले आहे. गेल्या दोन वर्षांपासून राज्यातील लोक हिंसाचार, हत्या, बलात्कार आणि स्थलांतराचा सामना करत आहेत. शेकडो लोक मृत्युमुखी पडले आहेत, हजारो लोक बेघर झाले आहेत. केंद्र सरकारच्या निर्णयानंतरही तेथे शांतता प्रस्थापित होत नसल्याचे कारण काय आहे?” असा प्रश्न त्यांनी विचारला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करत प्रियांका गांधी म्हणाल्या आहेत की, “पंतप्रधानांनी मणिपूरला वाऱ्यावर सोडलं आहे का? आजपर्यंत त्यांनी मणिपूरला भेट दिली नाही, राज्याच्या कोणत्याही प्रतिनिधीला भेटले नाही, शांततेचे आवाहन केले नाही किंवा कोणतेही ठोस प्रयत्न केले नाहीत. ही असंवेदनशील आणि बेजबाबदार वृत्ती कोणत्याही लोकशाहीसाठी अत्यंत दुर्दैवी आहे.”

त्या पुढे म्हणाल्या की, “देशातील नागरिकांसाठी शांतता आणि सुरक्षा सुनिश्चित करणे ही पंतप्रधानांची जबाबदारी आहे. यापासून मागे हटणे म्हणजे आपल्या कर्तव्यापासून दूर जाणं आहे.” दरम्यान, मणिपुरमध्ये मैतेई समुदायाच्या एका प्रमुख नेत्याच्या अटकेनंतर राज्यात हिंसाचार भडकला आहे. यामुळे इम्फालसह पाच जिल्ह्यांमध्ये इंटरनेट सेवा पाच दिवसांसाठी बंद करण्यात आली आहे. तर बिष्णुपुर जिल्ह्यात कर्फ्यू लागू करण्यात आला आहे.

मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार उफाळला! आंदोलकांचा आत्मदहनाचा प्रयत्न, अनेक जिल्ह्यांमध्ये संचारबंदी लागू