मी सामना संपवू शकत नाही… विराट कोहलीशी तुलना करताच बाबर आझम संतापला; रिपोर्टरला फटकारले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पाकिस्तान सुपर लीगमध्ये (PSL) हैदराबाद किंग्जमनविरुद्धच्या सामन्यात पेशावर झल्मीचा कर्णधार बाबर आझमने 43 धावांची खेळी केली, मात्र सामना शेवटपर्यंत नेण्यात तो अपयशी ठरला. झल्मीने 146 धावांचे लक्ष्य अगदी शेवटच्या चेंडूवर गाठले. बाबरने 37 चेंडूत 43 धावा करून चांगली सुरुवात केली होती, परंतु डावाच्या मध्यात तो बाद झाल्याने पुन्हा एकदा त्याच्या ‘फिनिशिंग’ क्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. या हंगामात खेळलेल्या दोन सामन्यांत बाबरने 82 धावा केल्या आहेत, मात्र त्याचा 126.15 चा स्ट्राईक रेट आणि संथ फलंदाजी टीकाकारांच्या निशाण्यावर आहे.

सामन्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत एका रिपोर्टरने बाबरच्या जखमेवर मीठ चोळले. “विराट कोहली तुमच्यासारखीच फलंदाजी करतो, पण तो नेहमी सामना संपवून (फिनिश करून) परततो, जे तुला ते जमत नाही,” असा थेट प्रश्न विचारत त्याने विराटशी तुलना केली. हा प्रश्न ऐकताच बाबर आझमचा पारा चढला. त्याने रिपोर्टरला सुनावले की, “या गोष्टी आता संपवा आणि स्वतःपाशीच ठेवा. ही तुलना थांबवून पुढे चला. मी सामने फिनिश करू शकत नाही, हा तुमचा केवळ एक गैरसमज आहे.”

IPL 2026 – गुजरातने अवघ्या एक धावेने सामना जिंकला, BCCI ने ठोठावला 12 लाखांचा दंड; नेमकं कारण काय?

बाबर आझम हा पाकिस्तानचा दिग्गज क्रिकेटपटू मानला जात असला तरी, टी-20 फॉरमॅटमधील त्याच्या कामगिरीवर सातत्याने टीका होत असते. विशेषतः मोठा धावसंख्यांचा पाठलाग करताना त्याचा संथ स्ट्राईक रेट आणि जबाबदारी न पेलण्याची वृत्ती यावर अनेकदा बोट ठेवले जाते. चालू पीएसएल हंगामातही बाबरने केवळ 10 चौकार आणि एक षटकार लगावला आहे. विराट कोहलीसारख्या दिग्गज खेळाडूशी होणारी तुलना टाळण्याचा प्रयत्न करत बाबरने सध्यातरी या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे.